बुधवार, ७ डिसेंबर, २०२२

📌 कामगार मित्रांनो भावनेच्या जगातून बाहेर या वास्तविकता ओळखा!

📌 कामगार मित्रांनो भावनेच्या जगातून बाहेर या वास्तविकता ओळखा!

  मित्रांनो, मागील काळात आपण एकजुट करून संप केला आपली एकच मागणी होती विलीनीकरण पण आपण परत एकदा नेतृत्व निवडण्यात अपयशी ठरलो. कामगार चळवळीत बाहेरील नेता निवडला तर एक तर राजकारण होते एक तर निराशा हे आपण उघड्या डोळयांनी पाहिले. कोणत्यातरी पक्षाच्या आमदारावर विश्वास ठेवून त्यांच्या नादी लावून विलीनीकरण सारखी मोठी मागणी मंजूर करण्यासाठी शेकडो कामगारांचे बळी दिले. खरे तर एका भाजप पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्याकडे कोणतेही अधिकार नव्हते, त्यांच्या पक्षात त्यांचे वजन नव्हते, पक्षाचे सरकार स्थापन झाले तरी त्यांना मंत्रिपद मिळाले नाही, ते आजही देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अंतिम निर्णयावर अवलंबून आहेत त्यांच्या विरोधात जाण्याची त्यांची क्षमता नाही भविष्यात जातील याची किंचितही क्षास्वती नाही. विलिनीकरण मागणीवर देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अगोदरच इले्ट्रॉनिक्स मीडियावर स्पष्ट केले आहे की आम्ही उच्च न्यायलयाने जो निर्णय दिला आहे त्याचे पालन करू...असे असताना गोपीचंद पडळकर साहेब यांच्या युनियन कडून १६ मागण्या मंजूर झाल्या आहेत यासाठी तगादा लावला जात आहे ...या मागण्या कोणत्याही ठिकाणी सरकारी कागदावर लेखी स्वरूपात पहायला मिळाल्या नाहीत तसेच या मागण्या भविष्यात मंजूर होतील याची गॅरंटी नाही मग असे असताना परत आपण यांच्या राजकारणाला बळी पडण्याचे का? ही झाली एक बाजू.
दिशाहीन संपाचे नेतृत्व करणारे वकील महाशय यांच्या बाबतीत कोणाला काही सांगण्याची आवश्यकता राहिली नाही त्यांचे सर्व सत्य बाहेर आले आहे. 
   मित्रांनो संपा दरम्यान वेतनाची हमी मविआ सरकारने चार वर्ष घेतली आहे पगारासाठी दर महिन्याला पैसे देण्याचे कबूल करण्यात आले असे असताना नवीन सरकार मात्र एस.टी.कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत गंभीर दिसत नाही ज्याठिकाणी 400 ते 500 कोटी वेतनासाठी द्यायला हवेत त्याठिकाणी 100 कोटी चा शासन निर्णय काढून कामगारांची थट्टा केली जात आहे. नवीन सरकारकडून एस टी.कामगारांच्या खूप आशा आहेत  विलीनीकरण मागणी नवीन सरकार मान्य करून घेणार नाही हे अंतिम सत्य आहे....ज्या ठिकाणी वेतन देण्यासाठी पैशांचा हिशोब लावला जात आहे ते सरकार येणाऱ्या 5 वर्षात एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करेल याचा विचार न केलेलाच बरा.....ही झाली दुसरी बाजू.

    वास्तविकता ओळखा मित्रांनो आपल्या वेतनाची तारीख परत चुकायला लागली आहे एक तर वेतन जेमतेम त्यात कर्मचारी कर्जबाजारी वेतन वेळेत झाले नाही तर किती अनर्थ होतात हे आपण पाहिले आहेत. परत आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये यासाठी आपली आर्थिक बाजू भक्कम करणे गरजेचे आहे त्यासाठी युनियन वाद बाजूला ठेवून ...मागील संपात जी अनियमित वेतनवाढ 5000/4000/2500 ही तफावत दूर करून सेवाज्येष्ठते नुसार वेतन करणे हे महत्वाचे आहे. ही तफावत दुर करुन अधिकृत वेतनवाढ मिळविण्यासाठी आपला वेतन करार करणे आवश्यक आहे सदर करार वेतन आयोगाप्रमाणे झाला तरी काही हरकत नाही पण *आपले वेतन हे नियमित व अधिकृत होणे आवश्यक आहे.*
   पडळकर साहेब यांची युनियन असो की अन्य कोणती युनियन यांनी कितीही बोलण्या सरकारशी केल्या तरी *कायदेशीर वेतन प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी आपल्या Recognised  संघटनेची आवश्यकता असते तिला सोबत घेऊन बोलणी केली तरच कामगारांचे प्रश्न योग्य रीतीने व जलद गतीने सोडविले जातील हीच वास्तविकता आहे.*
  मित्रानो आपण भावनेच्या जगातून बाहेर येऊन आपला स्वार्थ ओळखून तू तू मैं मैं बंद करून आपला स्वार्थ साधून घ्यावा ...आपण जर परत इतिहासाची पुनरावृत्ती केली तर आपला पदरी परत एकदा निराशा पडेल एवढे निश्चित......यावर अवश्य विचार करावा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शनिवार, ५ नोव्हेंबर, २०२२

✍️ *अविस्मरणीय ग्रेट भेट...* 🫱🏻‍🫲🏿

✍️ *अविस्मरणीय ग्रेट भेट...* 🫱🏻‍🫲🏿
         🥀🥀🥀🥀🥀
     दिनांक 01 नोव्हेंबर 2022 रोजी संघटनेच्या कामानिमित्त मी व माझे सहकारी चालक विनोद पाटील मुंबई मध्यवर्ती कार्यालय आलो होतो. मी एस.टी. मध्ये रुजू झाल्यापासून ते आजपर्यंत कोणत्याच VCMD यांना कधीही भेटलो नव्हतो तसा योगही आला नव्हता. मात्र मान्यताप्राप्त संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष *संदीप दादा शिंदे* यांच्यामार्फत मला त्यांची भेट घेण्याचा अविस्मरणीय योग आला..
      *एस.टी. महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा.श्री. शेखर चन्ने साहेब* यांचा मृदू, शांत, संयमी अभ्यासू स्वभाव अनुभवास आला. माझ्यासारख्या सामान्य वाहकाकडून एस.टी.बद्दलचे त्यांनी विचार ऐकुन घेतले, विविध समस्या व एस.टी.चे उत्पन्न वाढविण्याबाबत नेमक्या कशा व कोणत्या उपाययोजना करण्यात येतील त्याबाबत सविस्तर चर्चा त्यांनी केली याचे समाधान मला वाटले.

  ✸ आमच्या जळगाव विभागामधील कर्मचाऱ्यांना सध्या ETIM मशीन बाबत खूप समस्या येत आहेत. ज्या नादुरुस्त मशीन होत्या त्या स्वखर्चाने दुरुस्त करून दिवाळी सणामध्ये उत्पन्न वाढीसाठी वाहकांनी खूप मोठे योगदान दिले आहे. त्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी लवकरच नवीन मशीन जळगांव विभागाला देण्यात येतील तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी विपरीत परिस्थितीत उत्पन्न वाढीसाठी जे मनापासून केले त्यांचे अभिनंदन व पुढेही उत्पन्न वाढीचा फ्लो असाच सुरू ठेवतील अशी त्यांनी आशा व्यक्त केली.

✸ *उत्पन्न वाढीबाबत...*
       या मुद्यावर चर्चा करताना त्यांना एस.टी.महामंडळाने जुनी 10% सवलत योजना बंद केली होती ती परत सुरू केली तर नवीन तरुण  नोकरदार वर्ग, विविध क्षेत्रातील कामगार हे प्रवास करण्यासाठी एस.टी.ला प्रथम  प्राधान्य देतील परिणामी रोख उत्पन महामंडळाचे वाढेल असे सुचविले यावर गांभर्याने विचार करू असे त्यांनी आश्र्वशित केले.
      एस.टी.महामंडळाचे रोख उत्पन्न वाढले तर एस.टी.नफ्यात यायला जास्त काळ लागणार नाही त्यामुळे याबाबत विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे अशी लक्षवेधी सूचनाही माझ्याकडुन मांडली आहे. एस.टी.कर्मचाऱ्यांना जागृत करण्यासाठी तसेच प्रवाशांना एस.टी. कडे आकर्षित करण्यासाठी मी जो *"एस.टी.कर्मचारी मार्गदर्शक" ब्लॉग* तयार केला होता त्याचेही त्यांनी तोंडभरून कौतुक केले.

      *माझ्यासारख्या सामान्य वाहकाला वेळ देऊन त्यांनी चर्चा केली याबद्दल VCMD मा.चन्ने साहेब व आमच्या  संघटनेचे आशास्थान केंद्रीय अध्यक्ष संदीप दादा शिंदे यांचे खुप खुप आभार व धन्यवाद!*
🌹💐🎊🙏🥀

✍️ *नितीन बागले वाहक अमळनेर आगार* 🙏

सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२

चालक- वाहक यांना यांना कामगिरी न मिळाल्यास किंवा रद्द झाल्याने त्या दिवसाची हजेरी देणेबाबत

दैनंदिन कामगिरीवर हजर राहून सुद्धा चालक-वाहक यांना दिवस भरून दिला जात नव्हता.... याबाबत मान्यताप्राप्त संघटनेने दखल घेतली व उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे तक्रार केली.
यावर महाव्यवस्थापक (क.व.औ.स.) श्री.अजित गायकवाड यांनी आज दिनांक 26.09.2022 रोजी अधिकृत पत्र काढून दिवस भरून देण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

रविवार, १८ सप्टेंबर, २०२२

अमृत ज्येष्ठ नागरिक योजना : 75 वर्षांवरील नागरिकांचा मोफत प्रवास

 ज्येष्ठ नागरिक योजना : 75 वर्षांवरील नागरिकांचा मोफत प्रवास

  1. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास योजनेला गेल्या शुक्रवारपासून (ता. २६) सुरुवात झाली.
  2. या योजनेअंतर्गत 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बसमधून प्रवासादरम्यान वाहक शून्य मूल्य वर्ग तिकीट देतील. विशेष म्हणजे मोफत प्रवासाची ही सवलत एस टीच्या सर्व सेवांसोबतच शिवनेरी बस सेवेसाठी देखील लागू असणार आहे,असे व्यवस्थापकीय संचालक चन्ने यांनी प्रास्ताविकात सांगितले.
  3. आता ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत ७५ वर्षीय ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमध्ये मोफत प्रवास सवलत योजनेचा फायदा मिळायला सुरूवात झाली. यामुळे ज्येष्ठांना मोठा आधार मिळाला आहे.
  4. “७५ वर्षे वयोगटावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवास सवलतीची अंमलबजावणी केली जात आहे. ज्येष्ठ नागरिकांनी प्रवासादरम्यान आधार, पॅन, निवडणूक ओळखपत्र, वाहन परवाना, केंद्र, राज्य शासनातर्फे देण्यात आलेले ओळखपत्र यापैकी कोणताही एक पुरावा वाहकाला दाखविल्यास ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सवलत लागू आहे.”
  5. सवलत योजनेची वैशिष्ट्ये: वातानुकुलीत, शयनयानसह सर्व सेवा प्रकारांमध्ये ही सवलत अनुज्ञेय आहे. 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवांमध्ये 50 टक्के सवलत मिळत आहे. आता वातानुकुलीत, शयनयान आणि शिवनेरी या उच्चश्रेणी सेवांनाही ही सवलत लागू होणार आहे.
  6. 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बसमधून मोफत प्रवासासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र व केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास शून्य मूल्य वर्गाचे तिकीट देऊन मोफत प्रवास करता येईल.
   परिपत्रक 👇
     

रविवार, ७ ऑगस्ट, २०२२

गाडी नादुरुस्त झाली असता अथवा येण्यास उशीर झाला असता करावयाच्या मदतीसंबंधी व्यवस्था

 गाडी नादुरुस्त झाली असता अथवा येण्यास उशिर झाला असता करावयाच्या मदतीसंबंधी व्यवस्था

▫️◽▫️◽▫️▫️◽◽▫️▫️◽◽▫️▫️◽▫️◽◽▫️▫️◽▫️▫️▫️◽◽

राज्य परिवहन महामंडळाच्या बस गाडया विविध मार्गावर धावत असतात . ज्या गाडीत यांत्रिक बिघाड होतो त्यास " गाडी नादुरुस्त झाली असे म्हणतात.

 सर्वसाधारणपणे बस मधील डिझेल संपणे , एअर लॉक होणे , टायर फुटणे , पंक्चर होणे , फेक्झीबल पाईप तुटणे , फॅन बेल्ट तुटणे , जॉईन्टचे नट तुटणे , अॅक्सलचे नट तुटणे , अॅक्सल बाहेर येणे , साईलेंसर पाईप तुटणे , क्लचप्लेट निकामी होणे , क्राऊन पिनियन जाणे , गिअर बॉक्स मध्ये आवाज येणे , पिन बाहेर येणे इ . विविध कारणानी बस नादुरुस्त होऊ शकते . गाडी किरकोळ स्वरुपाच्या दोषामुळे नादुरुस्त झाली असल्यास उदा . फॅन बेल्ट बदलणे , टायर पंक्चर काढणे , ओअर लॉक काढणे , इ . दुरुस्त्या चालक / वाहकानीच करावयाच्या असतात . सदरच्या दुरुस्त्या किंवा ज्या दुरुस्त्या गाडीचे विश्रांतीच्या काळात केल्या जातात त्यावेळी ती नादुरुस्ती वाहन बिघाडात येत नाही . मात्र इतर दुरुस्त्या , ज्या चालक / वाहकाचे आवाक्या बाहेरच्या असतील , अशावेळी चालकानी वाहकाच्या मदतीने शक्य तो रस्त्याच्या कडेला बस उभी करून ठेवावी . बस नादुरुस्त कारणांची नोंद लॉगशिटवर नोंदवून बिघाड दूर करण्यासाठी कोणत्या हत्यांराची / साधनसामुग्रीची जरुरी आहे याबद्दल नेमकी माहिती वाहकाच्या मदतीने लि हून घेऊन ब्रेकडाऊन रीपोर्ट तयार करावा व त्या मार्गावरुन येणाऱ्या रा.प. बसच्या चालक / वाहकाबरोबर जवळच्या आगारात पाठवून द्यावा . आवश्यकता वाटल्यास रिलीफ बसची व्यवस्था करण्याबाबत कळवावे . अर्धा तासपर्यंत बस दुरुस्त न झाल्यास तसेच रिलीफ बस न आल्यास , मागाहून येणाऱ्या रा.प.बसने

प्रवाशांना त्यांचे इच्छित स्थळी पाठवून द्यावे . ज्या प्रवाशांना प्रवास करावयाचा नसेल त्यांना परतावा रक्कम हवी असल्यास झालेल्या प्रवास भाड्याचे पैसे वळते करून राहिलेल्या रक्कमेचा परतावा द्यावा . मात्र आवश्यक त्या नोंदी मार्गपत्रकावर करून तिकीटे मागून घेऊन ती रा.प.रकमेचा भरणा करताना सोबत जोडावीत . एखादी गाडी नादुरुस्त झाल्यास लेखी / तोंडी रिपोर्ट जेव्हा वाहतूक नियंत्रकाकडे येतो किंवा प्रत्यक्ष येऊन सांगितला जातो , तेव्हा वाहतूक नियंत्रकाने ब्रेकडाऊन फॉर्म भरून आगार कार्यशाळेत पुढील कार्यवाहीसाठी पाठवावा . गाडीचा असेल की , त्यामुळे गाडी पुढील मार्गावर धावूच शकणार नाही अशावेळी त्वरीत रिलीफ गाडीची व्यवस्था करण्यात यांत्रिक बिघाड असा यावी . ब्रेकडाऊन रिपोर्ट आगार शाळेत प्राप्त झाल्यावर तो ब्रेकडाऊन अटेंड करण्यासाठी ज्या हत्यारांची / साधनांची जरुरी असेल ते साहित्य त्वरीत गोळा करून कुशल यांत्रिक कर्मचाऱ्यांस ब्रेकडाऊनसाठी पाठवावे . ब्रेकडाऊन अटेंड केल्यावर केलेल्या दुरुस्तीच्या नोंदी लॉगशिटवर कराव्यात . जर त्या गाडीतील प्रवाशांची इतर गाड्यातून पुढे पाठविण्याची व्यवस्था झालेली नसेल तर बरोबर आणलेली गाडी पुढचे प्रवासासाठी द्यावी . व ब्रेकडाऊन गाडीची दुरुस्ती करून ती आगारात आणावी . यास रिपोर्टेड ब्रेकडाऊन म्हणतात . 

एखादी गाडी नियोजित वेळेपेक्षा एक तास होऊनही आली नाही अशावेळी कामगिरीवरील वाहतूक नियंत्रकानी त्या मार्गावरून येणाऱ्या गाड्यांचे चालक / वाहक तसेच इतर वाहन चालकाकडे चौकशी करावी . काहीच माहिती उपलब्ध न झाल्यास ती गाडी ब्रेकडाऊन झाली असल्याबाबतची माहिती आगार कार्यशाळेत कळवावी , प्रवाशांना कल्पना द्यावी . कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांनी गाडीच्या बिघाडाचे नेमके कारण शोधण्यासाठी सदर गाडीच्या मागील काही दिवसांच्या डिफेक्ट स्लिपा पाहून अंदाज करावा व त्यानुसार ब्रेकडाऊन साहित्य घेऊन त्या गाडीचे येण्याचे मार्गाने निघावे व गाडीचा शोध घेऊन पुढील कार्यवाही करावी .

रविवार, १० जुलै, २०२२

कामगार करार 1996- 2000 मधील रजे बाबतच्या खास तरतुदी

 *| कामगार करार १९९६-२००० मधील रजेबाबतच्या खास तरतूदी।*


 १) *नाकारलेल्या रजेचे रोखीकरण -* जर कर्मचाऱ्याने सरासरी वेतनावरील रजेसाठी अर्ज केला व अशी रजा प्रशासनाने कोणत्याही कारणासाठी नाकारली आणि अशा नाकारण्याचा परिणाम त्याच्या खाती विहीत मर्यादेपलिकडे रजा साठविल्यामुळे ती वाया गेली तर अशा कर्मचाऱ्याला व्यपगत रजेच्या कालावधीसाठी सरासरी वेतन देण्यात येते . 

२) *विकलांगता रजेसाठीच्या शर्तीबाबत -* ज्या प्रकरणामध्ये खास विकलांगता रजेचा समावेश आहे. त्या प्रकरणी अपघाता नंतर व्यवस्थापनाने कर्मचाऱ्याला ज्या रुग्णालयात दाखल केले असेल त्याचा दाखला विकलांगता रजा मंजूर करण्यासाठी ग्राह्य धरला जातो. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक किंवा मानसेवी वैद्यकिय अधिकारी यांचा दाखला सादर करण्याचा आग्रह धरला जात नाही. 

३) *सेवा समाप्तीनंतर द्यावयाची रजा-*  मृत /निवृत्त / राजीनामा दिलेल्या/ बडतर्फ / सेवामुक्त केलेल्या /स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या किंवा ज्या कर्मचाऱ्यांची सेवा वैद्यकिय कारणास्तव समाप्त केली असेल अशा कर्मचाऱ्यांच्या रजा, खात्यामध्ये न उपभोगलेली अर्जित रजा व वैद्यकिय कारणांसाठी अर्ध सरासरी वेतनावरील रजा जमा करण्याबाबत निरनिराळ्या लागू होणाऱ्या कायद्याच्या तरतूदींचे संबंधित कायद्यान्वये अनुज्ञेय रजेच्या मर्यादेपर्यंत पालन केले जाते. सदर रजेचे रोखीत रुपांतर केले जाते. 

४) *वैद्यकिय कारणादाखल रजा मंजूर करणे -* वैद्यकिय कारणांवरील रजा सामान्यतः नाकारण्यात येत नाही. तथापी ती नाकारणे अटळ ठरले तर संबंधित कर्मचाऱ्यांच्या प्रकरणी अशी रजा नाकारण्यापूर्वी ती प्रकरणे अभिप्रायासाठी प्रकरणपरत्वे मुख्य मानसेवी | वैद्यकिय अधिकारी / मानसेवी वैद्यकिय अधिकारी यांच्याकडे पाठविली जातात. 

५) *क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या रा.प.कर्मचाऱ्यास इजा झाल्यास विशेष रजा व वैद्यकिय खर्चाची प्रतिपूर्ती -* अधिकृत क्रीडा स्पर्धामध्ये भाग घेण्यासाठी रा.प.प्राधिकाऱ्यांनी ज्या कर्मचाऱ्याला अधिकृत केले आहे त्याला अशा स्पर्धामध्ये खेळताना इजा झाल्यास तो विशेष विकलांगता रजेसाठी हक्कदार होतो. ही विकलांगता रजा प्रकरण परत्वे महामंडळाचे मुख्य मानसेवी वैद्यकिय अधिकारी / मानसेवी वैद्यकिय अधिकारी यांनी प्रमाणीत करणे आवश्यक आहे. तसेच असा कर्मचारी जरी त्याने वैद्यकिय भत्त्याचा पर्याय निवडलेला असला तरी खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या फायद्यासाठी हक्कदार रहातो. 

६) स्वच्छक व मुद्रणालयातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यशाळा कामगारांप्रमाणे रजा न उपभोगता विकण्याची मुभा देण्यात आलेली आहे .

*७) पगारी सुट्टया -* ज्या कॅलेंडर महिन्यात साप्ताहिक सुट्टया व पगारी सुट्टया मिळालेल्या नसतील, तो महिना संपल्या नंतरच्या दोन महिन्यात भरपाई सुट्टया देण्यात येतात. नाहीतर ज्या ज्या महिन्यात मिळालेल्या नसतील तो महिना संपल्यानंतर तिसऱ्या महिन्या मध्ये कर्मचारी त्याच्या पसंतीप्रमाणे त्या घेण्यास स्वतंत्र रहातो. पगारी सुट्टया त्या त्या कर्मचाऱ्याला वर निर्देशित केल्याप्रमाणे दिल्या पाहिजेत. परंतु अशा सुट्टया व्यवस्थापन देऊ शकले नाही तर ते कॅलेंडर वर्ष संपेपर्यंत देण्याचा प्रयत्न केला जातो. पण व्यवस्थापन कॅलेंडर वर्ष संपेपर्यंत सुट्टया देऊ शकले नाही तर अशा रद्द झालेल्या पगारी सुट्टयांची भरपाई म्हणून कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजेमध्ये रुपांतर करून देण्यात येतात. चालक / वाहक, यांत्रिक कर्मचारीवर्ग व कार्यशाळा, डेपो आणि मुद्रणालय याठिकाणी काम करणारे सर्व कर्मचारी वर्षातून १० सुट्टयांचे हक्कदार असतात. या १० पैकी २ सुट्टया २६ जानेवारी व १५ ऑगस्ट या आहेत. उरलेल्या सुट्टया कार्यसमिती निश्चित करते. जर एखादी पगारी सुट्टी कर्मचाऱ्यांच्या आठवडा सुट्टीच्या दिवशी येत असेल तर अशा कर्मचाऱ्यांना अतिरिक्त भरपाई सुट्टी देण्यात येते. शॉप अॅण्ड एस्टॅब्लिशमेन्ट अॅक्ट खाली मोडणारे कर्मचारी म्हणजे शिपाई / कारकून / नाईक कनिष्ठ सहाय्यक / सहाय्यक वाहतूक निरिक्षक / वाहतूक निरिक्षक सहाय्यक वाहतूक अधिक्षक / सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक / आस्थापना पर्यवेक्षक / कार्यालयीन अधिक्षक इत्यादी यांना राज्य शासनाच्या निर्णयाप्रमाणे प्रतिवर्षी सार्वजनिक सुट्टया जाहिर केल्याप्रमाणे मिळतात. तसेच प्रतिवर्षी आठ नैमित्तिक रजा मिळतात . रोजंदार / तात्पुरत्या वेतन श्रेणीवरील कर्मचाऱ्यांना कामगिरीच्या १२ दिवसाला १ दिवस याप्रमाणे पगारी रजा मिळते.


✍️ *संकलन - नितिन बागले*


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖