शुक्रवार, ३० मार्च, २०१८

अग्रलेख

                  अग्रलेख
एसटी कर्मचाऱ्यांचे हाल कोण बघणार?
प्रवाशांचे प्रचंड हाल..., दिवाळीत गावी निघालेले प्रवासी अडकून पडले..., ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांची मनमानी, संप करून प्रवाशांना धरले वेठीस... असे मथळे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या बातम्या देताना बुधवारी विविध प्रसार माध्यमांनी दिले. जणू काही दिवाळीत सुट्टी मिळत नाही म्हणून एसटी कर्मचाऱ्यांनी संप केला आणि प्रवाशांची वाट लावली असेच त्यातून एखाद्या अनभिज्ञ व्यक्तीला वाटावे. सरकारनेही तीच बेफिकीरी दाखवली. परिवहन मंत्री दिवाकर रावते हे तर त्यापुढे गेले. सातवा आयोग पंचवीस वर्षे देणार नाही, देता येणार नाही, असे बोलण्याइतका खुर्चीचा माज रावते यांनीही दाखवला. जो तो प्रवाशांच्या हालाबाबत बोलत होता पण, प्रवाशांची अशी गैरसोय केल्याबद्दल हात जोडून माफी मागणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे हाल कोण समजून घेणार? त्यांच्या व्यथा कोण मांडणार? पंचवीस वर्षे नोकरी होऊनही फक्त पंचवीस हजार रुपयांमध्ये संसाराचे चाक ओढण्याची कसरत करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या दैन्यावस्थेचे चित्र जनतेसमोर कधी येणार? रावते यांनीच उधळपट्टी केली, एसटीचे चाक आणखी आर्थिक गर्तेत घातले या आरोपांबद्दल कुणीच कसे बोलत नाही? सातवा वेतन आयोग सोडा त्यांना योग्य ती पगारवाढ, भत्ते, सुविधा काहीही दिले जात नाही. त्यांनी तरी किती वाट पाहायची? अशा संप, आंदोलनांतूनच संपकर्त्या कामगारांच्या तीव्र भावना निष्क्रीय, बहिऱ्या सरकारपर्यंत पोहोचत असतात. अन्यथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात त्यानुसार, करू, करू, काहीतरी करू, माझ्यावर विश्वास ठेवा.. यावर विश्वास ठेवून पुन्हा ताटकळत बसावे लागेल. शिवसेनेचे पक्षप्रमुख दिलासा देतात आणि त्यांच्याच पक्षाचा एक नेता परिवहन मंत्री म्हणून उद्दाम भाषा करतो हे संतापजनक आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या मागण्या आजच्या नाहीत वा एसटीचे आजारपणही आजचे नाही. प्रत्येक सरकारच्या काळात एसटीकडे दुर्लक्ष होत आले आहे. कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्याही कानाआड टाकल्या गेल्या आहेत. महाड डेपोतून सुटणारी रामदास पठार-मुंबई बस आहे. त्या बसमधील एका वाहक महिलेने तिची व्यथा सांगितली होती. लहान बाळाला घरी ठेवून ती दररोज मुंबईला बस घेऊन जायची आणि यायची. पगार अवघा नऊ हजार रुपये. जवळची ड्यूटी द्यायला वरिष्ठ तयार नाहीत आणि तिला सवलत देता येईल एवढे मनुष्यबळही एसटीकडे नाही. राज्यातील जवळपास प्रत्येक खेड्यापाड्यात एसटी पोहोचली आहे. रात्रीची वसतीची गाडी घेऊन जाणारे एसटी वाहक-चालक झोपतातही त्याच एसटीत. त्यांचा एसटीविषयीची ही आस्था अनेक गावांनी, हजारो माणसांनी पाहिली आहे. हृदयविकाराचा झटका आलेला असतानाही गाडी बाजूला घेऊन प्रवाशांचा प्राण वाचवून आपल्या प्राणांचे बलिदान देणारे कर्मचारी एसटीला लाभले आहेत. तीही माणसेच आहेत. अशांच्या व्यथा तडीला लावण्यासाठी जर संप केला जात असेल तर सर्वसामान्य जनताही हे समजून घेऊ शकते. एसटीच्या सर्व विभागांतील सर्वच कर्मचारी एकजुटीने या संपात उतरले आहेत. खासगी बस भाड्याने घेण्यासाठी पैसे असणाऱ्या परिवहन महामंडळाने त्यांच्या महागाई भत्त्याची थकबाकी दिलेली नाही, त्यांना राबवण्याचे नवनवे मार्ग शोधणाऱ्या वरिष्ठांनी त्यांच्या विश्रांती कक्षाच्या दुरवस्थेकडे कधी लक्ष दिलेले नाही. चालक-वाहक कुठे झोपतात, कुठे जेवतात, काय खातात या कशाचीही पर्वा परिवहन मंत्र्यांनी आजवर दाखवलेली नाही. आणि वर आता संप केला म्हणून आत टाकण्याची आणि दंडाची धमकावणी सुरू झाली आहे. रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी संपकर्त्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. विदेश दौरे करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आपल्याच मातीतील माणसांवर चालवलेली ही दडपशाही दिसत नाही की खुपत नाही. कामावर या एवढाच धोशा सरकारकडून सुरू आहे. वेतनवाढ शक्य नाही, एसटीला दरवर्षी २०० कोटींचा तोटा होतोय, असे सांगितले जाते. हा तोटा कुणामुळे याची कारणे शोधायला लागली तर सरकारलाच सर्वप्रथम थकबाकीदार म्हणून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करावे लागेल. सरकारच्या विविध योजनांसाठी एसटीकडून प्रवास भाड्यात सवलत दिली जाते. सरकारकडे या सवलतींपोटी एसटीला देय असलेले काही हजार कोटी थकले आहेत. ही थकबाकी दिली गेली तरी एसटी कर्मचाऱ्यांच्या बहुतेक मागण्या मार्गी लागतील. गेली अनेक वर्षे ही थकबाकी देण्याचे कुठल्याही सरकारने नाव काढलेले नाही. खासगी बससेवेने एसटीचे उत्पन्न चिंताजनक पातळीपर्यंत घटवले आहे. ही बससेवा रोखण्याची इच्छाशक्ती प्रशासन आजवर दाखवू शकलेले नाही. उलट एसटीचे खासगीकरण करण्याची भाषा सुरू आहे. भाजपा आणि शिवसेना यांनी श्रेयासाठी एसटी कर्मचाऱ्यांना असे लटकवले असेल तर हे हीन कृत्य निषेधार्ह आहे.

आमदारांचा बाप ड्रायव्हर हवा होता

आमदारांचा बाप ड्रायव्हर हवा होता

एसटीचा तोटा 1900 कोटींवर गेला म्हणून सरकार त्यांना पगारवाढ नाकारतंय. मग राज्यावर पावणे तीन लाख कोटी रूपये कर्ज असताना आपली पगारवाढ करून घेताना नेत्यांना राज्याच्या तिजोरीची चाड नव्हती का? जर आमदारांच्या पगारवाढीचं समर्थन होत असेल तर 8 हजारात कुटुंब जगवणाऱ्या, महाराष्ट्राला प्रामाणिक सेवा देणाऱ्या ड्रायव्हर, कंडक्टरला न्याय मिळायलाच हवा.

एसटीच्या संपाची दाहकता मुंबईत बसून कळेलच असं नाही. मुंबईची लोकल बंद पडली तर मुंबईकरांचं जे हाल होतात तेच आज गावातल्या माणसांचं होतंय. एसटी ही ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन आहे. ऐन दिवाळीत एसटी बंद पडल्यानं यावर्षीची दिवाळी लोकांना प्रचंड यातनांसह साजरी करावी लागतीय.

मी एका खेड्यात लहानाचा मोठा झालो. त्यामुळे खेड्यातल्या माणसांसाठी एसटीचं महत्व काय असतं याची मला चांगली जाणीव आहे. वर्षानुवर्षं गावात एसटी घेऊन येणाऱ्या ड्रायव्हर, कंडक्टरसोबत गावातल्या माणसांचं एक नातं जुळलेलं असतं. मुक्कामी गाडीवरचे ड्रायव्हर, कंडक्टर तर त्या गावचे होऊन जातात. हे बिचारे ऊन, वारा, पाऊस काहीही असो गावाला अविरत सेवा देतात. गावाकडच्या रस्त्यांबद्दल काय बोलावं? तशा खड्यातुनही रोज सेवा देणारे ड्रायव्हर, कंडक्टर आज आपल्या न्याय्य हक्कांसाठी भांडताहेत. त्याचा सामान्यांना प्रचंड ञास होतोय. पण सरकारला ञास होत नाही हे दूर्दैवं. ड्रायव्हर, कंडक्टरचा मुलगा मंञी, मुख्यमंञी असता तर त्यांचं दुख तो समजू शकला असता. त्यांना आंदोलनाविना पगारवाढ मिळाली असती. हाच संप मुंबईतल्या लोकलच्या ड्रायव्हरने केला असता तर त्याचा जगभर बोभाटा झाला असता. पण गावाकडच्या माणसांच्या वेदना मुंबईतल्या मंञालयात पोहोचायला खूप काळ जावा लागतो. हजारो शेतकऱ्यांना मरावं लागलं तेव्हा कुठे सरकार नावाच्या व्यवस्थेला शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासाची आठवण होते.

एसटी कर्मचाऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. मुंबई पुण्यात प्रायव्हेट गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरला 12 हजार पगार आहे. एसटी चालवणाऱ्यांना 8 हजार हा कसला न्याय? मुंबई- पुण्यात त्यांनी आपली कुटुंबं कशी जगवायची? पोरांना कसं शिकवायचं? पोराबाळांची लग्नं कशी करायची? कामाचा किमान मोबदला मिळत नसेल तर त्याविरोधात लढायचंही नाही का? एसटी कर्मचाऱ्यांच्या संतापचा उद्रेक झालाय. त्यांची ही निर्णायक लढाई आहे. त्यातूनच हा ऐतिहासिक संप होतोय. सर्वसामान्य जनता प्रचंड हाल सोसतीय. दूर्दैवानं सरकार माञ बघ्याच्या भूमिकेत आहे. शह काटशहाच्या राजकारणात गुंतलंय. सर्वसामान्यांच्या संतापाचा उद्रेक होण्याआधी मुख्यञ्यांनी तोडगा काढवा, कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा हीच अपेक्षा.


कलम १८. (मार्ग परिवहन महामंडळ अधिनियम, १९५०) महामंडळाचे सर्वसाधारण कर्तव्य :-

कलम १८.  (मार्ग परिवहन महामंडळ अधिनियम, १९५०) महामंडळाचे सर्वसाधारण कर्तव्य :- 

ज्या राज्यासाठी महामंडळ स्थापन करण्यात असेल त्या राज्यात किंवा त्या राज्याच्या भागात आणि कोणत्  विस्तारित क्षेत्रात मार्ग परिवहन सेवांची कार्यक्षम, पुरेशी, किफायताशीर आणि योग्य रित्या समन्वित अशी यंत्रणा उपलब्ध होईल किंवा सुनिश्चित होईल यासाठी किंवा तिची अभिवृद्धी होईल अशा प्रकारे आपल्या अधिकारांचा अधिकाधिक वापर करणे हे महामंडळाचे सर्वसाधारण कर्तव्य अंसेल.
       परंतु, न्यायालयात किंवा अधिकरणापुढे कार्यवाही करुन जे कर्तव्य किंवा दायित्व व बजावून घेता येते अशा ज्या कर्तव्यास किंवा दायित्व वास महामंडळ एरव्ही अधीन नसते ते कर्तव्य किंवा दायित्व व या कलमातील  कामामुळेही महामंडळावर प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षय पणे लादले जाते अंसा त्याचा अर्थ लावला जाणार नाही़.

कलम १९.  (मार्ग परिवहन महामंडळ अधिनियम, १९५०) महामंडळाचे अधिकार :-

(१)    या अधिनियमाच्या उपबंधांच्या अधीनतेने, महामंडळास पुढील गोष्टी करण्याचे अधिकार असतील :
(क)   त्या राज्यात आणि कोणत्याही याही विस्तारित क्षेत्रात मार्ग परिवहन सेवा चालविणे.
(ख)   कोणत्याही सहाय्यभूत सेवेची तरतूद करणे.
(ग)   आपल्या कर्मचार्‍यांसाठी रास्ता वेतन, भविष्य निर्वाह निधीची स्थापना, राहण्याच्या जागा, विश्रामगृह व करमणूकगृह आणि अन्य सुखसोयी धरुन सेवानुकुल तरतूदी करणे ,
(घ)   आपल्या कर्मचा-यांना आणि अन्य व्यक्तीना विनााुल्क किंवा सवलतीच्या  दरानी आणि ज्या शर्ती लादणे तयास योग्य वाटेल अशाशर्तीवर पास देण्यासप्रधीकृती देणे,
(ड)   न वापरलेली तिकिटे आणि न वापरलेले सवलतीचे पास यांच्या बाबतीत परतावा देण्यास प्रधीकृती देणे.
(२)    या अधिनियमाच्या उपबंधांच्या अधीनतेने, पोट कलम (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारामध्ये पुढील गोष्टी करण्याचा अधिकारांचा समावेश अंसेल :-
(क)    पोटकलम (१) मध्ये निर्दिष्ट केल्यापैकी महामंडळाच्या कोणत्याही क्रियाव्यापारासाठी आवयक अंसलेली वाहनसामग्री, वाहने  उपयंत्रे, सयंत्रे, साधनसामग्री किंवा अन्य कोणतीही वस्तु यांची निर्मिती करणे, त्या या खरेदी करणे,सुस्थितीत ठेवणे आणि दुरुस्त करणे,
स्पष्टीकरण : या खंडातील ''निर्मिती'' या शब्दप्रयोगात, प्रयोगाच्या विंत्र्वा संशोधनाच्या कामासाठी करावयाची मोटारबांधणी खेरीज करुन संपूर्ण मोटार वाहनाची बांधणी करण्याचा समावेश होत नाही़
(ख)    सदर वरिल पैकी कोणत्याही क्रियाव्यापरासाठी महामंडळास आवश्यक वाटेल अशी जंगम आणि स्थावर संपत्ती संपादन करणे व धारण करणे, आणि आपण धारण केलेली कोणतीही संपत्ती ती भाडेपट्‌टयाने देणे, विकणे  किंवा अन्यथा हस्तांतरित करणे,
(ग)    अंन्य कोणत्याही व्यक्तींचा कोणत्याही उपक्रमाच्या कामात ज्या मर्यादेपर्यंत या राज्यात किंवा कोणत्याही विस्तारीत क्षेत्रात मार्ग परिवहन सेवा चालवण्याचा अंतर्भाव असेल त्या मर्यादेपर्यंत तो संपूर्ण उपक्रम किंवा त्याचा कोणताही भाग संबंधित राज्यात त्याकाळी अंमलात आलेल्या संपादनसंबंधी कायद्यानुसार आणि विहित अंसेल अशा कार्यपध्दतीनुसार कराराने किंवा सवलतीने आणि कायम करता किंवा काही कालावधीसाठी संपादन करण्याच्या योजना तयार करणे व तो त्याप्रमाणे संपादन करणे. 
(घ)    एखादी जमीन कराराने खरेदी करणे, किंवा भाडेपट्‌टयाने किंवा कोणत्याही प्रकारच्या भाडेदारीने घेणे आणि आपला उपक्रम चालू ठेवण्यासाठी आवश्यक वाटतील अशा इमारती त्या जमिनीवर उभारणे,
(ड)    मोडीत काढलेली वाहने, जुने टायर, वापरलेली तेले, टाकाऊ असे अन्य कोणतेही सामान किंवा विहित रितीने अप्रचलित म्हणून घोषित केले आहे असे अन्य भांडार सामान यांची विल्हेवाट लावण्याचा प्राधिकार देणे,
(च)    या आधिनियमाखालील आपली कर्तव्ये पार पाडण्यासाठी आणि त्या खालीली आपल्या आधिकाराचा वापर करण्यासाठी आवयक असतील अशा, सर्व संविदा करणे आणि त्याचे पालन करणे,
(छ)    महामंडळाने चालवलेल्या मार्ग परिवहन सेवेमध्ये वापरण्यासाठी योग्य असतील अशा प्रकारची वाहने खरेदी करणे,
(ज)    अन्य कोणत्याही उपक्रमाच्या मालकाचा मालकीची किंवा त्याचा कब्ज्यात असलेली वाहने, मोटारघरे, छप-या, कार्यालयाच्या इमारती, आगारे, जमीन, कार्याशाळा, साधनसामग्री, हत्यारे, वाहनांची उपसाधने व सुटे भाग, किंवा अन्य कोणतीही वस्तु महामंडळाने आपल्या उपक्रमाचा कामी त्यांचा वापर करण्याकरता खरेदी करणे किंवा अन्यथा कराराने मिळवणे,
(झ)    प्रशिक्षणाच्या, शिक्षणाच्या व संशोधनाच्या सोयी महामंडळाने उपलब्ध करणे व त्या उपलब्ध करण्याच्या कामी इतरांना सहाय करणे या शिवाय आणखी, महामंडळाकडे कामाला अंसलेल्या व्यक्तींचे कौशल्य किंवा महामंडळाच्या साधनासामुग्रीचे किंवा ज्या रीतीने ती वापरण्यात येते तिची कार्यक्षमता वाढविण्यासाठी कोणतीही गोष्ट करणे,
(त्र)    उतारुंची किंवा मालाची ने-आण करणारा परिवाहक म्हणून धंदा करणार्‍या कोणत्याही व्यक्तीशी महामंडळाच्या वतीने त् या व्यक्तीने थेट भाडे किंवा वाहनावर घेऊन उतारुंची किंवा मालाची ने-आण करण्याची तरतूद करणारे करार करणे आणि त् यांचे पालन करणे,
(ट)    मालाची रवानगी, साठवण आणि सुपूर्दगी करण्याच्या सोयी उपलब्ध करणे,
(ठ)    महामंडळाच्या वाहनांवर व आतील बाजूस आणि महामंडळाच्या जागेत भिंतीपत्रके व जाहितरात फलक प्रदर्शित  करण्यासाठी  तसेच महामंडळाकडून लोकांना देण्यात येणा-या तिकिटांवर व अंन्य प्रपत्रांवर जाहिरात देण्यासाठी संविदा करणे,
(ड)    महामंडळाचे कामकाज योग्य रितीने चालविणे सुकर व्हावे म्हणून राज्य शासनाच्या पूर्वमान्यतेने अंन्य सर्व गोष्टी करणे,
(३)    राज्य शासनाच्या पूर्वमान्यतेखेरीज पुढील गोष्टी करण्यास महामंडळास या कलमातील काहीही  प्राधिकृत करते अंसा त् याचा अंर्थ लावला जाणार नाही़
(१)    महामंडळाच्या उपक्रमात प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे वापरण्याची आवयकता नसलेल्या कोणत् याही वस्तूची निर्मिती करणे किंवा ती बाळगणे अंथवा जे वाहन महामंडळाच्या मालकीचे नाही  किंवा त्याच्या उपक्रमासाठी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे वापरण्यात येत नाही अंसे कोणतेही वाहन दुरुस्त  करणे, संग्रही ठेवणे  किंवा त्याचासाठी कोणत्याही संधारणाची तरतूद करणे,
(२)    अन्य व्यक्तीला विकण्यासाठी कोणतेही वाहन खरेदी करणे,
(३)    कोणत्याही व्यक्तीस वाहनांची वंगणे, सुटे भाग, साधन सामग्री किंवा उपसाधने विकणे किंवा पुरवणे,
(४)    या अधिनियमाद्वारे किंवा त्याखालील स्पष्टपणे उपबंधित केले असेल तेवढे खेरीज करुन एरव्ही उतारुंची किंवा मालाची ने-आण करण्यासाठी वाहने भाडयाने देणे.
(४)    या अधिनियमान्वये अन्यथा उपबंधित केले अंसेल तेवढे खेरीजकरुन पूर्वगामी उपबंधातील कोणतीही गोष्ट, महामंडळास त्या त्या वेळी अंमलात अंसलेला कोणताही कायदा दुर्लक्षिण्याचा प्राधिकार देते, अंसा तिचा अर्थ लावला जाणार नाही़.
(५)    महामंडळ अन्य कोणत्याही व्यक्तीचा संपूर्ण उपक्रम किंवा त्याचा कोणताही भाग संपादन करीत त् याबाबतीत महामंडळ आपल्या अधिका-यांची आणि कर्मचा-यांची नियुवस्र्ती करतांना, त्या उपक्रमात  कामाला अंसलेल्या कर्मचा-यांचे हक्क विचारात घेईल.
(६)    या कलमाच्या उपबंधामुळे, या अधिनियमातील नंतरच्या उपबंधाद्वारे  किंवा त्याखालील महामंडळात प्रदान करण्यात आलेला कोणताही अधिकार मर्यादित होतो अंसा तयाचा अंर्थ लावला जाणार नाही़
कलम २०.  (मार्ग परिवहन महामंडळ अधिनियम, १९५०) महामंडळाच्या मार्ग परिवहन सेवेचा अंन्य राज्याच्या क्षेत्रात विस्तार करणे :-
(१)    महामंडळास लोकहिताच्या  दृष्टीने आपल्या मार्ग परिवहन सेवांपैकी कोणत्याही सेवेचा अंन्य राज्यातील कोणत्याही नियतमार्गावर किंवा क्षेत्रात विस्तार करणे समयोचित वाटत अंसेल, तर त्यास राज्य शासनाच्या परवानगीने, प्रस्तावित विस्तारासंबंधी अन्य राज्याच्या शासनाशी वाटाघाटी करता येतील.
(२)    अन्य राज्याच्या शासनाने प्र्रस्तावित विस्तारास मान्यता दिली तर महामंडळ त् या प्रयोजनासाठी एक योजना तयार करीत व ती त्या अन्य शासनाकडे त्याच्या संमतीसाठी पाठवील आणि आशी संमती मिळाल्यानंतर महामंडळास राज्य शासनाची पूर्वमान्यता घेऊन ती योजना मंजूर करता येईल.
(३)    अशा रितीने योजना मंजूर करण्यात आल्यानंतर, महामंडळाने आपल्या मार्ग परिवहन सेवेचा  अशा नियतमार्गावर किंवा क्षेत्रात विस्तार करणे विधिमान्य ठरेल, आणि आशी सेवा याप्रमाणे विस्तारित करण्यात येईल तेव्हा ज्या अन्य राज्यात असा नियतमार्ग किंवा क्षेत्र असेल त्या राज्यात अमलात असलेल्या कोणत्याही विधिच्या उपबंधाच्या अधिनतेने महामंडळ त्या नियत मार्गावर किंवा क्षेत्रात ती सेवा चालवील.
(४)    या कलमाच्या पूर्वगामी उपबंधामध्ये उपबंधित  केलेल्या रितीने पूरक योजना तयार करुन व मंजूर करुन महामंडळास पोटकलम (२) अन्वये केलेल्या योजनेत वेळोवेळी  फेरबदल करता येतील किंवा तिचा विस्तार करता येईल.
कलम २१.  (मार्ग परिवहन महामंडळ अधिनियम, १९५०) डाक पोचवणे :-
       मोटार वाहन अधिनियम १९३९ यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, केंद्र शासनाने तसे आवयक केल्यास  महामंडळ याबाबत केंद्र शासन राज्य शासनाशी विचारविनिमय करुन विनिर्दिष्ट करील अशा दरांनी आणि अशा अटींवर व अटीवर डाक पोचवण्याचे काम करील.

✍✍✍ *एक चळवळ वळवळणारी नव्हे सळसळणारी! (भाषण)*

🚌

✍✍✍
*एक चळवळ वळवळणारी नव्हे सळसळणारी! (भाषण)*

                                    👉माझ्या आजुबाजूच्या सर्व सळसळत्या एस.टी.महामंडळातिल कामगार    तरुणाईला माझा मानाचा मुजरा.तसेच एका अभुतपुर्व अशा *"एस.टी.महामंडळ राज्य शासनात विलिनिकरणाच्या क्रांतीचे"* साक्षीदार बनू पाहणार्‍या आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन!

         👉 भारतातिल सर्वात मोठी परिवहन सेवा  असल्याकारणाने आपण सर्व बाबतीत पुढे प्रगती करावी अशी अपेक्षा आहे.
👉कारण--

👉एस.टी.महामंडळात भ्रष्टाचार बोकाळला आहे मात्र आता तोच शिष्टाचार झाल्याकारणाने तो आपल्या अंगवळणी पडला आहे.आपणही त्याचाच भाग बनल्याने त्याला विरोध असण्याचे कारण नाही.
            👉 आपल्या महामंडळात विविध आर्थिक, माणसिक तणावाने बरेच कामगार आत्महत्या करत असले तरी *आपल्या संवेदनाच बोथट झाल्याकारणाने तसेच अद्याप आपल्याला त्याची झळ पोहचली नसल्याने आपल्या मनात काही प्रतिक्रिया उमटण्याची किवा हळहळ वाटण्याची सुतराम शक्यता नाही.*

        👉आपल्या कामगारांना वेठबिगार्यासारखे कर्ज काढुन आपल्या मुला-बाळांचे शिक्षण, सांसारिक प्रपंच कसाबसा पुर्ण करावा लागत आहे. पण तरीही काही अडचण नाही कारण तेही आता आपण पचवू लागलोय.

    👉   आपण नादुरुस्त, खराब अवस्थेतिल एस.टी.बसेस रस्त्यांवर चालवुन आपला व प्रवाशांचा जीव धोक्यात घालत आहोत. तरीही घाबरण्याचे कारण नाही आता आपण प्रशासनाला प्रतिप्रश्न विचारणेच  बंद केलेले आहे.

         👉गरिब कामगारांवर    अन्याय होतोय पण त्यांना श्रीमंत,ताकदवान होण्यापासून कोणी रोखले होते काय असे आपण ती वेळ आपल्यावर येईपर्यंत म्हणू लागलोयच ना!

         👉मुलभूत पायाभूत गोष्ठींची कमतरता, अत्यल्प पगार, अवेळी झोप, जेवण, प्रमाणापेक्षा जास्त काम, रात्रवस्ती ठिकाणी गलिच्छ् वातावरणातुन मच्छर, डास यांपासुन होणारे रोग, इ. अशा अनेक अन्याय गोष्ठी आहेत पण आता त्या अंगवळणी पडल्या आहेत त्यामुळे त्यांची चीडही येत नाही व त्याविरूध्द लढावेसेही वाटत नाही.

         👉पण तरी सुध्दा कधी कधी आपल्यातील माणुसकी वा संवेदना जागृत झाल्याच तर हे सारे बदलावेसे वाटते पण ते आपण नव्हे तर *"’राजे’, आपण पुन्हा जन्माला या"*
 अशी निराशावादी हाक देऊन कारण आता आपले रक्तही भ्रष्ट झाले आहे.

👉 *तरी सुध्दा---*

      👉    हे सर्व पाहून,अनूभवून खरचं मित्रांनो
👉 *तुमचे तरूण रक्त उसळत नाही का?*

👉  *होणार्‍या अन्यायाविरूध्द संघर्ष करावासा वाटत नाही का?*

👉 *का खरेच आपले रक्त भ्रष्ट,मृत झाले आहे?*

        👉 मला मात्र असे बिल्कूल वाटत नाही. अजूनही आपली महाराष्ट्राची भुमी इतिहास घडविण्याबाबत व *युगपुरुष जन्माला न घालण्याइतपत वांझोटी झालेली नाहीये.*

         👉आपल्या मध्ये अजूनही जग जिंकण्याची जबरदस्त ताकद,इच्छाशक्ती आहे गरज आहे ती *आपल्यामधील स्पुल्लिंग चेतवण्याचे कारणआपल्या विचारावर निराशेची राख साचल्यामुळे आपले विचार निस्तेज झाले आहेत.*
 *त्या राखेवर एक जोरदार फुंकर घालून आपल्यामधील स्पुल्लिंग पेटल्यानंतर त्या आगीत सर्व जगातील अन्याय जळून राख होईल व तसेच त्या स्पुल्लिंगाच्या प्रकाशात सर्व जगाचा उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही.*
           👉किती दिवस राजकारण्यांना शिव्या देऊन परत त्यांनाच निवडून देणार आहोत,
*किती दिवस आपल्या या महामंडळातिल एकुण २० संघठणांकडुन पगारवाढीची अपेक्षा भोळी अपेक्षा बाळगुन राहणार आहेत.*

  👉आपल्याकडे पर्यायच उपलब्ध नाहीये. *अजुन किती दिवस कोणी काही करेल याची वाट पाहायची आहे.*
👉 ही अडचण नसून एक सोनेरी संधी आहे इतिहास घडवण्याची.
👉आता नुसती कामगार जागृती क्रांती करून भागणार नाही तर त्यासोबतच राजकीय क्रांतीचीही गरज आहे आणि त्यासाठी आपला सहभाग महत्वपूर्ण आहे.
👉 आता कोणी आपल्यासाठी काही करेल यापेक्षा आपण या आपल्या कामगार हितासाठी  काही तरी करूया असा विचार करून त्यादृष्टीने प्रयत्न करूया.
👉  *ही एका अभूतपूर्व  कामगार चळवळीची क्रांतीची सोनेरी पहाट आहे गरज आहे ती फक्त आपण जागे होण्याची.*

👉(आपल्याला पडणार्‍या सर्व प्रश्नाची उत्तरे न विचारताच मिळतील याची खात्री बाळगा.आपल्यालाही या एस.टी.महामंडळ राज्य शासनात विलिनिकरणाची क्रांतीमध्ये सहभागी व्हायचे असेल तर त्याची सुरुवात *("मी या एस.टी.महामंडळ राज्य शासनात विलिनिकरणाच्या क्रांतीचा एक अविभाज्य घटक आहे"  अशी येथे कमेंट करुन करा.)*
🚌

*जय संघर्ष...जय कामगार*
🙏

✍ *नितिन बागले, चोपडा आगार* 🚌

*महाराष्ट्र राज्य श्रमीक संघाला मान्यता देणे व अनुचित कामगार प्रथा प्रतिबंधक कायदा-* *१९७१(M.R.T.U.P.Act.1971)*

🚌
*महाराष्ट्र राज्य श्रमीक संघाला मान्यता देणे व अनुचित कामगार प्रथा प्रतिबंधक कायदा-* 
*१९७१(M.R.T.U.P.Act.1971)*

  👉 सदर कायद्याच्या तरतुदी संपुर्ण महाराष्ट्रात दि.९ सप्टेंबर १९७५ पासुन लागु करण्यात आल्या आहेत. या कायद्याच्या तरतुदी ज्या उद्योगाना औद्योगिक कलह कायदा १९४७ व मुंबई औद्योगिक सबंध कायदा १९४६ लागु आहे त्या सर्व उद्योगांना, ज्यात महाराष्ट्र शासन हे सक्षम शासन (अँप्रोप्रिएट गव्हर्मेंट) आहे, त्या ठिकाणी लागु आहेत. या कायद्याच्या कार्यरत असणार्या श्रमीक संघटनाना मान्यता देणे, मान्यताप्राप्त संघटणेचे हक्क आणि कर्तव्य, अमान्यताप्राप्त संघटनेचे हक्क, मालक कर्मचारी व संघटना यांच्या संदर्भातिल अनुचित कामगार प्रथा व त्यास प्रतिबंध करणे बाबतच्या तरतुदींचा समावेश आहे. या कायद्याखाली अनुचित कामगार प्रथा म्हणुन जाहीर व त्यास प्रतिबंध घालण्याचे अधिकार न्यायालयास आहेत. न्यायालयाने आदेश देवुनही मालकाने, संघटनेने किंवा कर्मचार्यांने सदर आदेशाचे पालन केले नाही तर न्यायालयाचा अवमान केला म्हणुन संबंधिता विरुद्ध तक्रार दाखल करता येते व न्यायालयाचा अवमान सिद्ध झाल्यास न्यायालय अशा व्यक्तिंना शिक्षा देखील देऊ शकते.

 *मान्यताप्राप्त संघटना-*

👉ज्या उद्योगात ५० किंवा ५० पेक्षा जास्त कामगार आहेत व ते ज्या संघटनेचे सभासद आहेत अशी संघटना न्यायालयात मान्यतेसाठी अर्ज सादर करु शकते. अर्ज सादर करण्यापुर्वी संबंधित संघटनेच्या वार्षिक सभेत तसा ठराव मंजुर करुन घ्यावा लागतो. ज्या मान्यतेसाठी अर्ज सादर केला त्या आधीच्या ६ महिण्याच्या कालावधीत अर्ज करणार्या संघटनेची कमीत कमी सभासद संख्या ३०% असणे आवश्यक आहे. न्यायालत अर्ज सादर करणार्या संघटनेचे सभासद ३०% किंवा ३०% पेक्षा जास्त आहेत हे सिद्ध झाले तर न्यायालय अशा संघटनाना मान्यताप्राप्त संघटना म्हणुन जाहीर करते. *रा.प.महामंडळात कर्मचार्यांच्या सेवा शर्ती ह्या संपुर्ण महाराष्ट्रात सारख्या असल्याने संपुर्ण महामंडळ हे एक उद्योग म्हणुन महाराष्ट्र शासनाने अधिसुचना जारी केली आहे.*
त्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रासाठी एकच मान्यताप्राप्त संघटना म्हणुन न्यायालय आदेश जारी करु शकते. *मान्यताप्राप्त संघटनेचा कालावधी हा दोन वर्षांचा असतो.*
जर त्या उद्योगात कार्यरत असलेल्या इतर श्रमीक संघटनानी मान्यतेसाठी अर्ज न केल्यास ती मान्यता कायम राहते. मान्यताप्राप्त संघटनेस दर ६ महिन्यांनी त्यांची सभासद संख्या ३०% पेक्षा कमी झाली नाही असे लेखा परिक्षीत विवरणपत्र न्यायालत दाखल करावे लागते. जर संघटनेची सभासद संख्या ३०% पेक्षा कमी झाली तर मान्यता आपोआप रद्द होते. इतर कोणत्या संघटनेने मान्यतेसाठी अर्ज केला असेल तर व मान्यताप्राप्त संघटनेपेक्षा अर्ज केलेल्या संघटनेची सभासद संख्या जास्ती झाल्याचे न्यायालत सिद्ध झाले तर न्यायालय अशा संघटनेस मान्यताप्राप्त संघटना म्हणुन जाहीर करते.

  *मान्यताप्राप्त संघटनेची कर्तव्य-*

👉१) सभासद वर्गणी कमीत कमी दरमहा ५० पैशापेक्षा कमी नसावी.

👉२) मान्यताप्राप्त संघटनेची समितीची बैठक ३ महिन्यातुन एकदा होणे आवश्यक आहे.

👉३) अशा बैठकीत सहमत झालेले सर्व ठराव तसेच जनरल बॉडीत झालेले ठराव याची नोंद संघटनेच्या इतिवृत्ताच्या पुस्तकात देणे आवश्यक आहे.

🚌 *संकलन- नितिन बागले, चोपडा आगार* 🚌

*कमी सभासद संख्या-*

🚌
*कमी सभासद संख्या-*

👉कोणत्याही उपक्रमात संघटनांची एका पेक्षा अधिक संख्या असल्यास त्याचा परिणाम कामगार संघाच्या भुमिकेवर होतो. कामगार संघटनांची संख्या अधिक असल्यास संपुर्ण कामगार शक्ती विभिन्न कामगार संघटनांमध्ये विभागल्या जावुन संघटनेअंतर्गत हेवेदावे उत्त्पन्न होतात. तसेच कमी सभासद संख्येचा दोष निर्माण होवुन पुरेशा निधी अभावी कामगारांच्या कल्याण विषयक कार्याची जवाबदारी व्यवस्थित रित्या पार पाडण्यास बर्याच कामगार संघटना असमर्थ ठरतात.
👉 मर्यादित सभासद संख्येमुळे कामगार संघटना वर्गणी द्वारे पुरेसा निधी उभारु शकत नाहीत. *आर्थिक सहाय्याकरता त्यांना राजकीय पक्षावर विसंबुन राहवे लागते.* कामगार संघटनेच्या आर्थिक कमजोरीमुळे कामगार कल्याण योजना हाती घेणे कामगार संघटनांना शक्य होत नाही. त्यामुळे कामगारांचा बौद्धिक, मानसिक विकास साधणे शक्य न झाल्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होत नाही. *तसेच बर्याचदा एखादी कामगार संघटना विधायक कार्य हाती घेत असेल तर दुसरी कामगार संघटना हेतुपुरस्कर त्या कार्याला विरोध करते.*
*खाजगीकरणाचा प्रश्न सोडल्यास दुसर्या कोणत्याच कारणासाठी महामंडळातील कामगार संघटना एकत्र आल्याचे आढळुन येत नाही.*
*कोणताही एक कामगार संघ कामगारांचा एकमेव प्रतिनिधी असतो त्याच वेळी कामगारांच्या हिताचे रक्षण करता येते.*

*कामगारांतर्फे बोलणारे दोन किंवा अधिक कामगार संघ निर्माण झाल्यास कामगारांच्या हिताचा विनाश होतो.*
 असे मत तज्ञ कामगार नेत्यांनी व्यक्त केले आहे.

*निष्कर्ष-*

👉 *एकंदरीत कामगार संघटनेच्या भुमिकेचा विचार केल्यास महामंडळात अनेक कामगार संघटना असल्यामुळे त्यांची भुमिका परस्पर सहकार्य आणि कामगार कल्याणाऐवजी त्यांच्यामध्ये द्वेष, मत्सर आणि स्पर्धा निर्माण होते आणि त्यामुळे कामगार संघाची उद्दिष्टे सफल होत नसल्याचे संशोधनामध्ये दिसुन येते.*

🚌 *नितिन बागले, चोपडा आगार* 🚌

एस.टी.महामंडळाचा व एस.टी.कामगारांचा छ्ळ कशासाठी?

🚌

✍ *एस.टी.महामंडळाचा व एस.टी.कामगारांचा छ्ळ कशासाठी?* 

📌  तत्कालीन मुंबई प्रांताचे मुख्य प्रधान श्री.मोराजी देसाई यांनी प्रवाशी वाहतुकीच्या राष्ट्रीयकरणाची घोषणा स्वातंत्र्यापुर्वीच केली व त्यावेळच्या मुंबई प्रांतातील अहमदाबाद येथील शहरी बस सेवेचे राष्ट्रीयकरण प्रथम करण्याचे ठरवले व अशी बससेवा दि.०१/०४/१९४७ रोजी अहमदाबाद येथे सुरु झाली.स्वातंत्र्यानंतर बससेवेचा विस्तार संपुर्ण देशभर करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले व त्या दृष्टीने 'स्टेट ट्रान्सपोर्ट' हा स्वतंत्र विभाग उघडण्यात आला.
दि. १जुन१९४८ ला पुणे ते अहमदनगर ही पहिली बससेवा सुरु करण्यात आली व ' गाव तेथे एस.टी.' हे घोष वाक्य घेऊन एस.टी.ने लोकांना व गावांना जोडायला सुरुवात केली.
 त्यानंतर सन १९५० मध्ये 'रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन' कायदा तयार करण्यात आला व विभागीय महामंडळ निर्माण करुन खर्या अर्थाने राष्ट्रीयकरणाची मुहुर्तमेढ रोवण्यात आली. यानंतर विविध राज्यात विभागीय महामंडळे स्थापन करुन देशभर एस.टी.सर्वसामान्य जनतेच्या सेवेत सुरु झाली.
   महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला दरवर्षी कार्याचा अहवाल विधानसभेत सादर करावा लागतो. त्यात प्रवाश्यांना सुविधा, कामगार संबंध, गाड्या व त्यांचा वापर नफा- तोटा, इ. संपुर्ण प्रकारची माहिती द्यावी लागते.
  *अशा पद्धतिने एस.टी.ही जनप्रतिनिधींना संपुर्णपणे जवाबदार जवाबदार असते. शासनातर्फे आमदारांच्या समिती नेमल्या जातात व त्यावरही अहवाल विधानसभेत मांडला जातो.*

👉 एस.टी.महामंडळाने सुरुवातीला ३६ वाहन घेउन सुरु झालेला १९४८ मधील पुणे विभाग मार्च १९९२ पर्यंत ११ विभाग होऊन त्याकडे १९४६ वाहने होती.
 ही झाली पुर्वीची स्थिती.

📌आता २०१६ पर्यंत अंदाजीत एस.टी.कडे १९००० हजार वाहने आहेत. तुलनेने महाराष्ट्राची लोकसंख्या वाढली, प्रवाशी वाढले पण एस.टी.गाड्यांची संख्या वाढली नाही.
एस.टी.महामंडळाची प्रगती होत नसुन अधोगती होत आहे, याचे कारण आहे राजकिय ईच्छाशक्ती व महामंडळामध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार.
✍  *थोडक्यात विश्लेषण-*

👉१. एस.टी.महामंडळ सध्या संपुर्ण भारत देशात महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त १७% प्रवाशी कर भरत आहे. अन्य कुठल्याही राज्यात एवढा कर एस.टी.भरत नाही. परिणामी प्रवाशी भाडेवाढ.

२. तसेच एस.टी.ला जी डिझेल सब्सिडी मिळत होती ती बंद केली महाराष्ट्र शासनाने, त्याचा परिणाम प्रवाशी भाडेवाढ.
३. एस.टी.स्थापन झाल्यापासुन विस्तार वाढला खरा पण नंतर व आता बसेस कमी करुन, लांब पल्ल्याचे रुट बंद करुन विस्तार कमी केला जात आहे.
४. शासन हळुहळु एस.टी.चे रुट, बसेस, कर्मचारी, कमी करत आहे.
५. एस.टी.च्या मोक्याच्या जागेची विक्री करत आहे (मुंबई सेंट्र्ल आगार) याचा अर्थ आपल्या आय.ए.एस. अधिकारी व तज्ञ लोकांनी काढावा.
६. आज पर्यंत शासनाची दुरर्शन वरिल अशी जाहिरात दाखवा की, महाराष्ट्राच्या प्रवाशी जनतेने एस.टी.बसने प्रवास करा. एस.टी.महामंडळ सांगते पण शासन सांगत नाही.
७. तसेच असा आमदार, मंत्री दाखवा  की तो एस.टी.बसने प्रवास करतो व सोबत आव्हान करतो का एस.टी.ने प्रवास करा म्हणुन नाही ना?
८. सरकारने विविध महामंडळांचा, योजनांचा विकास व्हायला पाहिजे त्यासाठी एखाद्या प्रसिद्ध सेलिब्रेटींना आयकॉन म्हणुन जाहिरात करायला लावतात, पण असा एखादा सेलिब्रिटी कधी एस.टी.चा प्रचार व प्रसार होण्यासाठी नेमला.का?  नाही.
९. या महाराष्ट्र राज्यात कधीच आमदार, मंत्री, सेलीब्रेटी, क्लासवन अधिकारी, इ. प्रवास करीत नाही, त्या एस.टी.मध्ये प्रवाशी जनतेला खिळखिळ्या बसेसची अवस्था करुन, प्रवासभाडे वाढवुन प्रवास करायला कसे आव्हान करणार?


  उलट प्रवाशी कर वाढवुन, दिवाळीला भाडे वाढ करुन, डिझेल सब्सिडी रद्द करुन प्रवाश्यांना एस.टी.तुन प्रवा करण्यापासुन वंचीत करत आहेत लांब करत आहेत.
अवैध प्रवाशी वाहतुकीला अशा निर्णयातुन प्रोत्साहन मिळत आहे.
यात सरकार स्पशेल अपयशी ठरत आहे.
 मग यांची एस.टी.चालवण्याची इच्छाशक्ती आहे का? का फक्त एस.टी.वाचविण्याचे सोंग चालु आहे.
असे का घडत आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे,  कारणही तसेच आहे.
  👉जेवढीही राजकिय मंडळी आहे, त्यांचा स्वत: चा ट्रव्हल्स व्यवसाय आहेत, प्रत्येकाकडे चार- चार हजार बसेस आहेत. या चालविण्यासाठी व स्वत: चा उद्योग व्यवसाय वाढविण्यासाठी एस.टी.महामंडळा कुठलेही अर्थ सहाय्य न देता हळुहळु खाजगीकरण करुन बंद करण्याचा डाव राजकीय मंडळी करत आहे.
👉 *१०.मोराजी देसाईनी एस.टी.चे राष्ट्रीयकरण केले तर आपले विद्यमान परिवहन व दळणवळण मंत्री खाजगीकरण करत आहेत, टप्पे वाहतुकीला परवाणे देत आहेत. ही अत्यंत खेदाची बाब आहे.*
  यात नुकसान होत आहे सर्वसामान्य प्रवाशी जनतेच व कष्टकरी एस.टी.कामगारांचे.
जो सर्वसामान्य गरिब माणुस एस.टी.ने प्रवास करीत आहे, त्याचे प्रवास करण्याचे हक्काचे साधनच हिसकावुन घेण्याचा घाट करत आहेत.
 
📌  *राहिला प्रश्न एस.टी.कर्मचार्यांचा...*
👉  एवढी खराब अवस्था एस.टी.ची केल्यावर कर्मचार्यांचे काय हाल होत आहेत याचा विचारच दुर आहे.
१. *संपुर्ण भारत देशात एस.टी.कर्मचार्यांचा पगार सर्वात कमी अशी ख्याती मिळवणारे एकमेव महामंडळ.*
२. या महागाईच्या देशात दैनंदिन सुखसोयीच्या वस्तु विकत घेण्याची ऐपत एस.टी.कर्मचार्यांची नाही आहे, अशी अवस्था आमच्या कामगारांची आहे.
३. तोट्याच्या नावाखाली कर्मचार्यांचा छ्ळ चालु आहे आणि एस.टी.कामगार तो तोटा भरुन काढण्यासाठी, एस.टी.टिकली पाहिजे, आपला घर प्रपंच चालला पाहिजे यासाठी अहोरात्र डबल-डुयटी करुन राब राब राबुन मरत आहे, झिजत आहे.
४. त्यात अजुन नविन भर वाहकांवर अक्षर: हिटलरशाही पद्धतिने दंडात्मक परिपत्रके काढुन त्यांना नौकरी सोडण्यासाठी भाग पाडले जात आहे.
५. तसेच एस.टी.मधील सत्राशे साठ(२०) संघटना विविध राजकिय पक्षाच्या स्थापन होऊन मतदान व मान्यतेसाठी कामगारांचा छ्ळ चालु आहे, त्यासाठी कामगारांचा बळी दिला जात आहे.
  📌  *तेंव्हा प्रवाशी मित्रांनो व कामगार मित्रांनो या कुटील राजकिय डावापासुन वेळीच सावध होवुन ' एस.टी.वाचवा' व " एस.टी.महामंडळ राज्य शासनात विलिन करा" ही मोहीम हातात घेऊन संघर्ष करण्यासाठी सरकारला जाब विचारण्याची खरी वेळ येवुन ठेपली आहे.*

🚌  ✍ *नितिन बागले, चोपडा आगार* 🚌

एस. टी. जगली पाहिजे, जगविली पाहिजे…*

🚌
*एस. टी. जगली पाहिजे, जगविली पाहिजे…* 🚌

प्रबोधन
👉ज्या देशात दळणवळणाची व वाहतुकीसाठी अत्याधुनिक संसाधने व सोयी असतील, त्यावरून त्या राष्ट्राच्या, राज्याच्या विकासाचे मोजमाप करण्यात येते. ज्या देशात रस्ते सुसूत्रीकरण अधिक असते त्या देशाच्या विकासाचा दर हा अधिक असतो, असा अर्थशास्त्राचा सिद्धान्त आहे. पर्यायाने व्यापार, उदिम, उद्योजकता आणि औद्योगिकीकरणामध्ये दळणवळण आणि प्रवासाच्या साधनांचा महत्त्वपूर्ण वाटा असतो. आजच्या स्थितीत सुविधापूर्ण व वैध प्रवासी वाहतूक करणारी संस्था म्हणून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची प्रतिमा आहे. ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून लौकिक मिळविलेली एसटी बस जिव्हाळ्याचे नाते जपणारी, आशिया खंडात सर्वात मोठी प्रवासी वाहतूक करणारी संस्था म्हणून एकेकाळी मानसन्मान व प्रतिष्ठा प्राप्त केलेली संस्था असली, तरी आज मानवनिर्मित विविध संकटांचा सामना करत ती आपली वाटचाल करीत आहे.
एसटीच्या बाजूने होणारा एखादा निर्णय एसटीच्या हितासाठी जाहीर होण्याची आज गरज निर्माण झाली आहे. १९८०-८५ च्या नंतरच्या काळात एस. टी.ने बदलत्या काळानुरूप स्वतःमध्ये आमूलाग्र बदल स्वीकारले व जनतेची गरज विचारात घेऊन निमआराम, व्होल्वो, शिवनेरी, परिवर्तन, मिनीबस, महाबस अशा विविध प्रकारचे बदल करून घेतले. तरीही आजच्या खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाच्या जमान्यात प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या एसटीला आता खाजगी अवैध प्रवासी वाहतुकीची स्पर्धा निर्माण झाली आहे. आरटीओ व पोलिस विभागाने एसटी महामंडळास सकारात्मक सहकार्य केले, तर एसटी निश्‍चित खाजगी अवैध प्रवासी वाहतुकीच्या स्पर्धेत आपली दमदार वाटचाल चालू ठेवू शकते. त्यासाठी एसटी सातत्याने प्रवासीभिमुख धोरणांचे नियोजन करून प्रवाशांकरिता विविध प्रकारच्या आकर्षक सुविधा देण्याचा प्रयत्न करीत असते. आजच्या घडीला प्रवाशांना एसटी महामंडळ, विविध ३० प्रकारच्या भाड्यात सूट देते. महामंडळाच्या बसेसचे होणारे अपघात टाळण्यासाठी विविध अपघात प्रतिबंधक योजना राबवीत असते. त्यामुळे एसटीचे अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे. खाजगी अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांचे मालक अपघातप्रसंगी कोणत्याही सुविधा पुरवीत नाहीत. याउलट एखाद्या प्रवाशाने एसटीचे तिकीट काढले की, त्या प्रवाशाचा एक लक्ष रुपयांचा विमा महामंडळ उतरवत असते. तसेच प्रवाशाचा अपघातात मृत्यू झाल्यास दहा लक्ष रुपये त्याच्या नातेवाईकास देण्यात येतात. एसटी महामंडळ शासनाच्या आर्थिक महसुलात दररोज १७.५ टक्के प्रवासी कराच्या रूपाने रोख रकमेचा भरणा करीत असते. शासनाने याच पार्श्‍वभूमीवर खाजगी प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनधारकांवर काही प्रवासी सुविधा पुरविण्याबाबत सक्ती करण्याची गरज निर्माण झाली असून, प्रवासी कर कमी करण्याचीही नितान्त आवश्यकता आहे.
देशात, राज्यात किंवा कुठेही निदर्शने, आंदोलने, धरणे, बंद झाले, तर सर्वप्रथम एसटीवरच दगडफेक होत असते. कोणत्याही आंदोलनात एसटी आंदोलनाची बळी ठरलेली असते. वास्तविकत: एसटी बसगाड्यांचे नुकसान हे सार्वजनिक असल्याने, अंतिमतः देशातील प्रत्येक नागरिकाचे हे व्यक्तिगत नुकसान आहे. कारण ही सर्वांची सार्वजनिक मालमत्ता आहे. त्यामुळे तिचे खरे मालक आपणच आहोत, अशी भावना प्रत्येकाने मनात बाळगावी. एसटीवर दगडफेक, अडवणूक केल्यानंतर आंदोलन यशस्वी झाल्यासारखे नेत्यांना वाटते. परंतु, झालेले नुकसान भरून काढण्यासाठी बंद पुकारणार्‍या पक्षांना तथा नेत्यांना दंड देण्याची तरतूद आहे. समजा, एसटीने जर ठरविले की, आंदोलनाच्या दिवशी सर्व बसेस आगारातच उभ्या ठेवाव्यात, तर त्यामुळे प्रवाशांच्या अडचणीत भर पडेल आणि शासनाचेही महसुलाच्या रूपाने आर्थिक नुकसान होईल. म्हणजे एकाच वेळी दोन्हीही पातळ्यांवर सार्वजनिक नुकसान होऊ शकते. हे टाळण्यासाठी समाजातील सर्वांनी एसटी आंदोलनाचे लक्ष्य होऊ नये म्हणून सार्वजनिक प्रयत्नांची गरज आहे. कारण ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली एस. टी. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेऊन वाटचाल करीत असताना आज खाजगी, अवैध प्रवासी वाहतुकीच्या कचाट्यात सापडली आहे. प्रवासी भाड्यात सूट मिळणारा प्रवासी हा एस. टी.ने प्रवास करतो, तर पूर्ण रकमेचे भाडे भरणारे प्रवासी खाजगी अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांद्वारे प्रवास करतात. म्हणून ‘गाव तेथे एसटी’ चा नारा देणार्‍या एसटीला नेते, पदाधिकारी, गावपुढारी आणि सर्वसामान्य नागरिक आदी सर्वांमधून एकच आवाज येण्याची गरज आहे. तो आवाज म्हणजे- ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी एस. टी. जगली पाहिजे… जगविली पाहिजे…

लाल डब्यातील रावतेशही

      लाल डब्यातील रावतेशही


       साधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते, उलट-सुलट भूमिका जाहीर करते, एकंदरीत हास्यास्पद वाटावे, असे एकंदरीत वागणे सुरू होते, तसे काहीसे आपले आदरणीय परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे झाल्याचे मला वाटते. तरी मी फारच क्षुल्लक आणि हलकी-फुलकी तुलना केली, असे म्हणावयास हवे. कारण एसटी महामंडळात गेल्या काही दिवसात त्यांनी जे निर्णय घेतले आहेत, त्यावरुन हसावे की रडावे, असा अंतिम प्रश्नच माझ्यासमोर उरतो.


मुळात शिवसेनेच्या सामान्य कार्यकर्त्यापसून ते अगदी सध्याचे सर्वोच्च असलेले उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सारेच काहीसे कन्फ्युज्ड आहेत. त्यामुळे त्यांचा एखादा मंत्रीही तसाच कन्फ्युज्ड असला, तर त्यात नवल असे काही नाही. कन्फ्युजन हे त्यांच्या पक्षाचं दुर्धर दुखणं असू शकतं. पण प्रॉब्लेम असा आहे ना, की या मंत्र्यांच्या गोंधळी कारभाराचा हजारो कर्मचारी आणि लाखो लोकांच्या रोजच्या जगण्यावर परिणाम होतो आहे. त्यामुळे प्रकरण गंभीर आहे. पर्यायाने त्याची दखलही गंभीरपणेच घ्यावी लागते. म्हणून हा खटाटोप.


दिवाकर रावते यांच्या अपयशी आणि हास्यास्पद कार्य कर्तृत्वाचा आढावा घेण्याआधी परिवहन मंत्री म्हणून ते ज्या एसटी महामंडळाचे अध्यक्ष आहेत,त्या एसटी महामंडळात सध्याच्या आकडेवारीवरुन आपण एक नजर फिरवू. जेणेकरुन पुढे रावते साहेबांच्या पराक्रमाचे नागडे रुप किती गंभीर आहे,हे आपल्याला लक्षात येण्यास सोपे जाईल.


राज्यात एसटीची कर्मचारी संख्या 1 लाख 2 हजार असून, एसटी बसची संख्या 17 हजार, एसटीच्या आगारांची संख्या 258, विभागीय कार्यालयांची संख्या 31 आहे. दररोज जवळपास 70 लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात. म्हणजे जवळपास 75 लाख लोकांचा एसटी या परिवहन मंडळाशी रोजचा संबंध येतो, असे आपण गृहीत धरु. खरंतर गृहीत धरण्याची गरज नाही. कारण आपल्याकडे आकडेवारीच आहे. त्यामुळे ही संख्या वास्तविक आहे. पण असो. म्हणजे इतक्या प्रचंड संख्येतील लोकांशी रोजचा संबंध रावते यांच्या प्रत्येक निर्णयाचा येतो, असे आपण मानून चालू. आता रावतेंच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेऊ. एक एक करुन मुद्देसूद बोलू. म्हणजे समजायला सोपे जाईल. कारण आधीच कन्फ्युज्ड असलेल्यांना आपले म्हणणे नीट सविस्तर सांगणे आवश्यक आहे. अन्यथा विषयांतर करत गाडी रेमटवण्याची जुनी खोड सेनेतल्यांना आहे. असो.


खरंतर मी याआधी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान ‘लालराणीचा राजा उपाशी’ नावाचा ब्लॉग लिहिला होता. मात्र संप आणि तत्कालीन स्थिती एवढाच त्या ब्लॉगचा आवाका होता. त्यानंतर सातत्याने मी एसटी, परिवहन मंत्री, कर्मचारी, त्यांचे प्रश्न यासंबंधी विशेष लक्ष ठेवून होतो. अनेक अपडेट मिळवत होतो. मग एकेदिवशी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या सर्व सुविधा बंद करण्याचा निर्णय-कम-हुकूम परिवहनमंत्र्यांनी काढला, त्यावेळी लिहिणार होतो. पण म्हटले ठिकंय राव, एका निर्णयाने कुठे एखाद्या मंत्र्याला झोडपून काढायचे, म्हणून थांबलो. पण मध्यंतरी असल्या हुकुमांची जंत्री वाढतच गेली आणि परवा खासगी कंपनीला स्वच्छतेचं कोटींचे कंत्राट देऊन परिवहन मंत्र्यांनी हुकुमांचा कळस चढवला. मग मात्र न राहून आपली लेखणी हाती घ्यावी लागली.


शिवसेना या पक्षाच्या अजेंड्यावर कोणतेही मुद्दे असोत, पण या पक्षाने प्रत्येक मुद्द्यावर मोर्चे नेलेत,आंदोलने केली, तोडफोड केली, जाळपोळ केलीय. बरं हे सत्तेत नसताना केलीच, पण असतानाही करत आहेत. अशा आंदोलनांच्या जीवावर वाढलेल्या एका अंदाधुंद पक्षाच्या मंत्र्याने काही दिवसांपूर्वी केवळ निषेधाची निदर्शनं केली म्हणून निवृत्त कर्मचाऱ्यांची सर्व सोई-सुविधा बंद करण्याच्या जुलमी हुकूम जारी केला. शिवाय, काही निवृत्त कर्मचाऱ्यांचा मोफत पासची सुविधाही कायमची बंद करुन टाकली.


त्याचे झाले असे की, सध्या सेवेत असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीचा प्रश्न प्रलंबित आहे. या वेतनवाढीच्या मागणीसाठी एसटीचेच निवृत्त कर्मचारी एकत्र आले. ठिकठिकाणच्या एसटी डेपो बाहेर निदर्शने केली. मुळात लोकशाहीत कुणालाही आंदोलने, निदर्शने करण्याचा अधिकार आहे. त्याही पुढे जात विचार करावयाचा झाल्यास, इथे तर कर्मचाऱ्यांच्या पोटा-पाण्याचा प्रश्न होता, त्यांच्या संसाराचा प्रश्न होता. त्यासाठी आंदोलन करणाऱ्यांना अशा पद्धतीने जुलमी हुकुमाखाली दडपावे, हे आंदोलनाचा इतिहास सांगणाऱ्या शिवसेनेसारख्या पक्षाच्या दिवाकर रावते नामक मंत्र्याला शोभानीय आहे का? ज्यांच्या आंदोलनांनी आतापर्यंत एसटीचे अतोनात नुकसान केले आहे,तेच नेते आता एसटी कर्मचाऱ्यांसाठी लढणाऱ्यांची अशी पिळवणूक करत आहेत. हे चित्र अस्वस्थ करणारे आहे.


बरं या दिवाकर रावते यांची ही हुकमी मानसिकता इथेच थांबत नाही. यापुढेही भयंकर गोष्टी आहेत. त्यातली आणखी एक दोन उदाहरणे इथे नमूद करणे मला अत्यंत गरजेचे वाटते.


परवाचीच गोष्ट. परिवहन मंत्र्यांनी एक निर्णय घेतला की, राज्यभरातील 33 डेपो आणि बस स्टँड यांच्या स्वच्छतेसाठी खासगी कंपनीला कंत्राट देण्यात आले. ब्रिस्क इंडिया लिमिटेड असे या कंपनीचे नाव. हे कंत्राट तब्बल 447 कोटी रुपयांचे आहे. डेपो आणि बस स्टँड यांची स्वच्छता राखली पाहिजे, यात कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही. पण रावते यांच्या या निर्णयातून अनेक प्रश्न उपस्थित राहतात,ज्यांच्यामुळे पुढे आणखी गंभीर प्रश्न उभे ठाकतात


एसटी महामंडळाकडे आधीच 1800 सफाई कर्मचारी उपलब्ध आहेत. म्हणजे कुमक असताना केवळ एखाद्या खासगी कंपनीच्या घशात पैसे घालायचे म्हणून 447 कोटी एवढ्या प्रचंड रकमेचा कंत्राट रावतेंनी दिला आहे. सफाई कर्मचारीच नसते, तर या कंत्राटाला अर्थ होता. मात्र असून नसल्यासारखे करणे, हे कितपत योग्य आहे?शिवाय, दुसरीकडे जेव्हा कधी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीची मागणी होते, तेव्हा एसटी महामंडळ तोट्यात असल्याचे कारण पुढे केले जाते. मग सफाई कर्मचारी असताना, 447 कोटींचे कंत्राट देण्यास कुठून पैसे येतात? यामागे नेमका लॉजिक काय? या प्रश्नसोबत आणखी एक प्रश्न म्हणजे, सध्या असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांचे काय? त्यांना कुठल्या पर्यायी पदावर काम देणार आहात की खासगीकरणाच्या दगडाखाली बेरोजगार करुन टाकणार आहात?


चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला अशी गत असलेली शिवशाही बससेवा असो वा कर्मचाऱ्यांच्या ओल्या जखमेंवर मीठ चोळून लाखो-कोट्यवधींचा खर्च करुन मराठी सप्ताह दिन साजरा करणं असो, कर्मचाऱ्यांच्या नवीन ड्रेसच्या वेळी उडालेला फज्जा असो किंवा त्याआधीचं केवळ फेसबकुवर खदखद व्यक्त केली म्हणून कर्मचाऱ्याचं निलंबन असो.... दिवाकर रावते यांनी एसटी महामंडळातील आपल्या उलाढाल्यांवरुन कायमच भोंगळ कारभाराचं जाहीर प्रदर्शन घडवलं आहे.


ज्याची गरज आहे ते सोडून नको ते करण्यात रावतेंचा हात कुणी धरणार नाही. म्हणजे, एसटी गाड्यांची दुरवस्था होत असताना, वूट-बिट सारखी वायफाय लावणे असो किंवा बस स्टँडची दुरवस्था झालेली असताना लाखोंचे खर्च करत मराठी भाषा सप्ताह साजरे करणे असो... खर्च व्हावे, पण ते योग्य कामावर व्हावेत, गरजेच्या गोष्टींवर व्हावेत. मात्र एसटी महामंडळात तसे अजिबात दिसत नाही.


धक्कादायक म्हणजे, दिवाकर रावते यांच्या या अजब-गजब कार्याची दखल ना मुख्यमंत्री घेत, ना महाराष्ट्राचे कैवारी आदरणीय उद्धव ठाकरे घेत... एक लाखाहून कर्मचारी असलेल्या आणि 70 लाखांहून अधिक लोकांचा रोजचा संबंध येणाऱ्या या महामंडळाकडे इतके अक्षम्य दुर्लक्ष का केले जात असावे? की सार्वजनिक सेवा पार कोलमडवून बंद करण्याचा इरादा आहे?


वेतनवाढीचा प्रश्न बिकट आहे. कर्मचाऱ्यांची मानसिकात प्रचंड भयंकर अवस्थेत जाऊन पोहोचली आहे. आठ-दहा हजारात शिफ्टच्या बाहेर जाऊन काम करावे लागत आहे. मानसिक आरोग्यसह शारीरिक आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. असे असताना, या प्रश्नांवर आवाज उठवल्यास रावतेंच्या हुकुमी स्वभावाला सामोरं जावं लागतं, म्हणून कर्मचारीही मुक्याचा मार सोसत आहेत. असंख्य संसारं रोज रडतायेत. तरीही गांभिर्याने घेतले जात नाही. कमाल आहे!


सार्वजनिक परिवहन सेवा बऱ्याचदा फायद्यात नसते. किंबहुना, नसतेच म्हणूया. आणि मुळात ती फायद्यासाठी चालवली जात नाही. कारण ती सेवा असते. महाराष्ट्राचा विचार केल्यास, ग्रामीण भाग मोठा आहे. हा ग्रामीण भाग निमशहरी भागांना जोडण्यात एसटीचा वाटा मोठा आहे. अशा एसटीकडे इतक्या लाईटली पाहिले जाते आणि राज्याचे प्रमुख त्याची दखलही घेत नाहीत, हे किती भयंकर आहे. राज्यातील अनेक निमशहरं एसटी स्टँडच्या भोवताली विस्तारत गेली आहेत. म्हणजे, एसटी स्टँड हे शहरांचे मध्यवर्ती केंद्र झाले आहेत. मग अशा ठिकाणाचा नीट वापर करुन, फायद्याच्या दृष्टीने विचार नाही का होऊ शकत? शिवशाही असो वा शिवनेरी, अनावश्यक सेवा बंद करुन, जिथे गरज आहे, तिथे नाही का सेवा वाढवू शकत? असे एक-ना-अनेक प्रश्न आहेत, ज्यावर परिवहन मंत्र्यांचा आणि महामंडळाचे निर्णय फार विसंगत आहेत.


रावतेंच्या या कारभाराने एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा त्रास तर वाढत जातोच आहे. पण त्यांच्या निर्णयांनी एसटी महामंडळ डबघाईस येईल, असे म्हणण्यासही वाव आहे. एसटी महामंडळातील या रावतेशाहीवर सरकारने उपाय काढणे आवश्यक आहे. आजही कित्येक गावं केवळ एसटीमुळे शहरांशी जोडले गेलेत. एसटीच्या फेऱ्या त्या त्या गावात बंद झाल्यास, ते गाव देशाच्या कुठल्याच नकाशावर नाही, अशी स्थिती निर्माण होते. त्यामुळे हे सारेच सरकारने गंभीरपणे घेणे गरजेचे आहे.


संदर्भ :

1. आंदोलन केले म्हणून निवृत्त कर्मचाऱ्यांच्या सवलती बंद

2. सफाई कामगार असूनही खासगी कंपनीला कंत्राट

3. फेसबुकवर पोस्ट लिहिल्याने कर्मचाऱ्याचे निलंबन

4. मापं न जुळल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे गणवेश परत

महाराष्ट्रात धावलेल्या पहिल्या* *एसटी बसची रंजक कहाणी

     *महाराष्ट्रात धावलेल्या पहिल्या*
      *एसटी बसची रंजक कहाणी*
     _तिला कुणी एसटी म्हणतं… कुणी लालपरी म्हणतं तर कुणी लाल डब्बाही म्हणतं… कुणाला ती प्राणाहून प्रिय आहे तर कुणी तिचा तिरस्कारही करतं मात्र ती महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे हे कुणीही नाकारु शकत नाही. आज महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात जाऊन लोकांची ने आण करण्याचं काम एसटी करते. खेड्यापाड्यात आजही लोक एसटी वाट पाहात थांबलेली दिसतात कारण वाहतुकीसाठी त्यांना आधार आहे फक्त एसटीचाच…एसटीचा प्रवास, सुखाचा प्रवास… असा नारा सरकारने दिला किंवा तिला बहुजन हिताय, बहुजन सुखाय असंही म्हटलं गेलं मात्र आपल्याला तिचा खरा इतिहास माहीत आहे का? महाराष्ट्रातील पहिली एसटी केव्हा सुरु झाली? ती कोणत्या दोन शहरांमध्ये धावली? तेव्हा एसटीचं तिकीट नेमकं किती रुपये होतं? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? पडला असेल किंवा नसेल पडला तरी आज आम्ही तुमच्यासाठी या प्रश्नांची उत्तरं घेऊन आलो आहोत._
        *१ जून १९४८ रोजी*
     *पहिल्यांदा धावली एसटी*
      _महाराष्ट्राच्या रस्त्यावर पहिली एसटी बस धावली तो दिवस होता 1 जून 1948. आत्ता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ असं नाव असलं तरी तेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली नव्हती त्यामुळे हे नाव असण्याचा प्रश्न नव्हता. तेव्हा गुजरात, मुंबई आणि महाराष्ट्र मिळून ‘बॉम्बे स्टेट’ होतं. त्यामुळे बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन असं एसटी महामंडळाचं नाव होतं. एसटी बस कुठल्या दोन शहरांमध्ये धावणार याची जशी तुम्हाला उत्सुकता होती तशी उत्सुकता त्यावेळच्या लोकांमध्येही होती. अहमदनगर आणि पुणे ही ती दोन भाग्यवान शहरं होती ज्यांच्या दरम्यान पहिली एसटी बस धावली होती. पहिली एसटी बस म्हणजे तिचा थाट विचारायला हवा का? किसन राऊत नावाच्या व्यक्तीला ही पहिली एसटी बस चालवण्याचा बहुमान मिळाला होता, तर लक्ष्मण केवटे नावाचे गृहस्थ वाहक होते._
  *कशी होती पहिली एसटी बस ?*
     _जी बस पहिली एसटी बस म्हणून धावली तिची बॉ़डी आजच्यासारखी लोखंडी नव्हती किंवा आतमध्ये अॅल्युमिनिअमचं कामही नव्हतं. ती एक लाकडी बॉडी होती आणि वरुन जे छप्पर होतं ते चक्क कापडी होतं. लाकडी बॉडी असलेल्या या बसची आसनक्षमता 30 होती. सकाळी ठिक 8 वाजता ही बस अहमदनगरहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. या बसचं तिकीट होतं अडीच रुपये._
          *ठिकठिकाणी झाले* 
           *जल्लोषात स्वागत*
     _अहमदनगर ते पुणे प्रवासाच्या दरम्यान चास, सुपा, शिरुर, लोणीकंद अशी गावं लागली. लोक एसटी बस थांबवून प्रवास करण्याची इच्छा व्यक्त करत होते. मात्र आसनक्षमतेमुळे ते शक्य नव्हतं. ज्या गावांमधून पहिली एसटी जाणार होती त्या गावांमध्ये आजूबाजू च्या गावांमधील लोकांनी मोठी गर्दी केली होती. वाहनं तशी अभावानंच पहायला मिळणाऱ्या या दिवसांमध्ये लोकांना या गाडीचं अप्रूप वाटणं सहाजिक होतं.  गावागावांमध्ये लोक बसचं जल्लोषात स्वागत करत. नवीन वाहनं आणल्यावर आज आपल्याकडे सवासिनी त्याची पुजा करतात किंवा आजही एखाद्या गावात एसटीची सेवा सुरु झाली तरी अशी पुजा केली जाते. तेव्हाही गावागावां मध्ये सवासिनी पुजेचं ताट घेऊन उभ्या होत्या. एसटी गावात पोहोचली की तिची पुजा केली जाई._
     *पोलीस बंदोबस्तात धावली*
          *पहिली एसटी बस*
     _पुण्यामध्ये शिवाजीनगर जवळच्या कॉर्पोरेशनपाशी या बसचा शेवटचा थांबा होता, मात्र त्यावेळी पुण्यात अवैध वाहतूक जोरात होती. राज्य महामंडळाची बस सुरु झाल्याने या अवैध वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता होती त्यामुळे एसटीवर हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. एसटीवर हल्ला होण्याची शक्यता राज्य सरकारने गांभीर्याने घेतली होती. त्यामुळे पुण्यात एसटीने प्रवेश केल्यापासून म्हणजेच माळीवाडा वेशीपासून ही बस पोलीस बंदोबस्तात कॉर्पोरेशनपर्यंत आणण्यात आली._
     _*येत्या 1 जून रोजी या घटनेला 70 वर्षे होतील. आजही त्याच निश्चयाने एसटी लोकांना गावोगावी पोहोचवण्याचं काम करत आहे. आम्हाला तिचा अभिमान आहे*_  🙏

C.T.C. - Cost Of Company

🚌

 📌 *आपल्या एसटी कर्मचार्यांच्या माहितीसाठी-*

   _प्रशासनाकडुन पगारवाढीचा आकडा फुगवुन दिशाभुल करण्याचा_

  ©   *C.T.C. - Cost Of Company*

    वेतन करार करतांना पगारवाढ दिल्यामुळे प्रशासनावर काही अप्रत्यक्ष खर्चाचा बोजा पडतो त्याला *C.T.C* असे म्हणतात.

उदा- एखाद्या कर्मचार्याला जर मुळ पगारात ₹१०००/- वाढ दिली तर त्यावर १२% टक्के PF भविष्य निर्वाह निधी( भ.नि.नी.) व ५.७६% टक्के उपदान ( ग्रॅज्युईटी) असे १७.७६% ने रक्कम प्रशासनाला भरावी लागते. म्हणुन प्रशासन वाढ जाहीर करतांना १०००+१७७.६० असे *११७७.६०* वाढ जाहीर करते.
*परंतु प्रत्यक्षात कर्मचार्याला ₹१०००/-* *वाढ मिळते.*
 हे सुत्र मान्यताप्राप्त संघटनाही मान्य करते.
   त्यानुसार सन १९९६ चा करार, २००८ व २०१२ च्या करार मध्ये १७.७६ % टक्के प्रमाणे अधिकचा बोजा मान्यताप्राप्त संघटनेने मान्य केला होता.
ईथ पर्यंत ठिक होते.
 
     परंतु आता प्रशासन १७.७६% ऐवजी *२८.८०% टक्के CTC*  धरण्याचा आग्रह करीत आहे.
२८.८०% मध्ये
PF भविष्य निर्वाह निधी १२%
उपदान(ग्रॅज्युईटी) ८% टक्के व
रजा रोखीकरण ८.५०% असे एकुण
  *२८.८० % टक्के अप्रत्यक्ष वाढ धरण्याचा आग्रह करीत आहे. त्यामुळे कर्मचार्यांना प्रत्यक्ष वाढ कमी मिळते व वाढीचा आकडा फुगवुन दाखवला जातो.*

👉  समजा २०१६ च्या करारात एखाद्या कर्मचार्याला ₹ ५०००/- वाढ मिळाली तर २८.८० % प्रमाणे भार काढल्यास ₹१४००/- ईतका होईल व प्रत्यक्ष भार  ₹६४००/-

  तसेच २०१६ च्या कराराचे पॅकेज ₹ १५०० कोटी जाहीर झाले तर त्याच्यात CTC २८.८०% प्रमाणे ४३२ कोटी अप्रत्यक्षपणे कापला जाईल.
  आपल्याला प्रत्यक्ष पगारवाढ ₹१०६८/-  कोटींचीच मिळेल.
    त्यामुळे कर्मचार्यांनो पगारवाढ घेतांना या C.T.C. चा विचार होणे कर्मचार्यांसाठी आवश्यक आहे.



*संकलन- नितिन बागले, चोपडा आगार*
 
🙏🙏🙏🙏