बुधवार, ११ जून, २०२५

एस.टी.चालकांसाठी अपघात विरहीत सेवा बिल्ला योजना – एक सविस्तर माहिती

एस.टी. चालकांसाठी अपघात विरहीत सेवा बिल्ला योजना – एक सविस्तर माहिती
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस.टी.) ही संस्था केवळ प्रवासाची सोय उपलब्ध करून देत नाही, तर लाखो प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही अत्यंत जबाबदारीने पार पाडते. यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती चालकांची – जे दररोज हजारो किलोमीटर अंतर पार करत, प्रवाशांना सुरक्षितपणे त्यांच्या गंतव्य स्थानी पोहोचवतात.
हीच जबाबदारीची भावना ओळखून, एस.टी. महामंडळाने "अपघात विरहीत सुरक्षित सेवा कालावधी बिल्ला योजना" सुरु केली आहे. ही योजना चालकांना त्यांच्या अपघात विरहीत सेवेसाठी सन्मानित करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

या योजनेचा उद्देश काय आहे?
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे एस.टी. चालकांनी त्यांच्या सेवाकालात अपघात टाळण्यासाठी जे प्रामाणिक प्रयत्न केले आहेत, त्यांचे कौतुक करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे.

कोण पात्र आहे?
कायम, नैमित्तिक व रोजंदारीवरील सर्व चालक व चालक-वाहक या योजनेस पात्र आहेत.
भाडेतत्वावरील किंवा कंत्राटी चालकांना ही योजना लागू नाही.

विना अपघात सेवा बिल्ला कोणत्या कालावधीनुसार दिला जाईल?
सेवा कालावधी देण्यात येणारा बिल्ला
५ वर्ष ५ वर्ष विना अपघात सेवा बिल्ला
१० वर्ष १० वर्ष विना अपघात सेवा बिल्ला
१५ वर्ष १५ वर्ष विना अपघात सेवा बिल्ला
२० वर्ष २० वर्ष विना अपघात सेवा बिल्ला
२५ वर्ष २५ वर्ष विना अपघात सेवा बिल्ला
३० वर्ष ३० वर्ष विना अपघात सेवा बिल्ला

❖ उदाहरण: जर एखादा चालक ०१.०१.२०२० रोजी सेवेत रुजू झाला, तर ५ वर्ष पूर्ण होतात ३१.१२.२०२४ रोजी. जर त्या कालावधीत त्याने अपघातविना सेवा केली असेल, तर त्याला ५ वर्ष विना अपघात सेवा बिल्ला देण्यात येईल.

बिल्ला देण्यासाठी काही अटी :

1. किरकोळ अपघात सवलत:
०५, १०, १५, २०, २५ किंवा ३० वर्षांच्या सेवेत जास्तीत जास्त ३ किरकोळ अपघात झाले तरी बिल्ला देण्यात येईल, जरी चालक जबाबदार असला तरी.

2. सेवा कालावधीची मोजणी:
पूर्वी एका वर्षात किमान २६० दिवस सेवा ही अट होती. आता ती काढून टाकण्यात आली आहे. आता केवळ एकूण सेवाकाल लक्षात घेतला जाईल.

3. न्यायालय निर्णय:
जर अपघात प्रकरणात पोलिसांनी चालक जबाबदार धरला, पण न्यायालयात निर्दोष ठरवले, तर त्याला बिल्ला मिळेल.

बिल्ला कधी व कुठे दिला जाईल?

प्रमुख राष्ट्रीय सणांना:
दरवर्षी १ मे (कामगार दिन) किंवा २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) दिवशी.
आगार/घटक पातळीवर:
सर्व पात्र चालकांचा सन्मान सोहळा आगार व विभाग पातळीवर पार पाडण्यात येईल.

या योजनेचा खर्च कुठून केला जाईल?
योजनेचा खर्च "हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता निधी" यामधून केला जाईल.

नोंद व कागदपत्रांची व्यवस्था:
चालकाच्या व्यक्तिगत फाईल व सेवापुस्तकात ही नोंद केली जाईल.
आगार व विभागीय कार्यालयात विहीत नमुन्यात नोंदवही ठेवली जाईल.
जर चालकाची बदली झाली, तर माहिती संबंधित आगार व विभागाला देणे बंधनकारक आहे.

काही महत्त्वाच्या सूचना:
अर्ज प्राप्त झाल्यावर आगार व्यवस्थापकाने ती बारकाईने तपासून विभागीय कार्यालयाकडे पाठवावी.
पात्र चालकांची नावे सुचना फलकावर लावावीत.
बिल्ला ही महामंडळाची मालमत्ता आहे, त्याची जबाबदारी संबंधित चालकावर असेल.

उपसंहार:
ही योजना म्हणजे चालकांच्या निष्ठावान, प्रामाणिक आणि सुरक्षित सेवेला मिळणारा एक सरकारी सन्मान आहे. अपघातमुक्त सेवा ही केवळ कौशल्याची नाही, तर जबाबदारीची आणि जाणीवेची साक्ष आहे. अशा चालकांना मान्यता देणे ही एस.टी. महामंडळाची प्रेरणादायी पावले आहेत.

✍️ – नितीन बागले
(एस.टी. महामंडळातील कर्मचारी, सामाजिक अभ्यासक, माहिती अधिकार कार्यकर्ता)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा